'गंगा- चंद्र' काव्य पुरस्कारांचे दिमाखात वितरण, मान्यवरांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2025

'गंगा- चंद्र' काव्य पुरस्कारांचे दिमाखात वितरण, मान्यवरांची उपस्थिती

   


आजरा : गोपाळ गडकरी / सी. एल. वृत्तसेवा

       गंगा, चंद्र, साहित्य कला सेवा मंच घाटकरवाडी (ता. आजरा) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. घाटकरवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास बर्डेकर (माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, राज्यमंत्री दर्जा) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक सलीम मुल्ला उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीहरी पाटील व सौ. जिजाबाई श्रीहरी पाटील यांच्या लग्नाच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त श्रीहरी पाटील दांपत्याचे अभिष्टचिंतन करण्यात आले. 


      कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, फोटो पूजन व शालेय विद्यार्थ्यांच्या कविता गायनाने करण्यात आली. गंगा चंद्र मंचचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी प्रास्ताविक केले. विविध चार पुरस्कारांसाठी घेण्यात आलेल्या काव्यसंग्रह स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक विजेत्या काव्यसंग्रहांना पुरस्कार देण्यात आले. यात सर्व कवींसाठी खुला असलेल्या राज्यस्तरीय 'श्रीहरी काव्य पुरस्कार' डॉ. श्रीकांत पाटील (घुणकी जिल्हा कोल्हापूर) यांच्या 'काळच उत्तर देईल' या काव्यसंग्रहास, केवळ महिला कवींसाठी दिला जाणारा 'जिजाई काव्य पुरस्कार' प्राचार्या रेखा दीक्षित (कोल्हापूर) यांच्या 'मौनातील चाफा' या काव्यसंग्रहासाठी,  नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी दिला जाणारा 'सुवर्णसाक्षी काव्य पुरस्कार' भारती पाटील (कामेरी. जि. सांगली) यांच्या 'अंतिम दुःखाचे वर्तुळ' या काव्यसंग्रहासाठी तर 'गंगा-चंद्र विशेष काव्य पुरस्कार' स्नेहल पंडित (आजरा जि. कोल्हापूर) यांच्या शब्द माझे सोबती या काव्यसंग्रहाला देण्यात आला. सर्व विजेत्या कवींना शाल स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. 


        यावेळी साहित्यव्रती पुरस्कार सन्मानित दशरथ माडभगत यांच्या प्रपंच या सातव्या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांसह माडभगत यांच्या भगिनी नंदाताई पताडे व मदन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर साहित्यव्रती पुरस्कार देऊन सलीम सरदार मुल्ला तसेच वनपाल प्रतिभा पाटील यांना गौरविण्यात आले. 

      पुरस्कार विजेत्यांनी आपल्या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे वाचन करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांत आनंद व अश्रूही तरळले.  आपल्या अंगभूत कलेची झलक दाखवताना ८६ वर्षीय श्रीहरी पाटील यांनी राधे कृष्ण तमाशातील गण व राजा हरिश्चंद्रांचा वग गाऊन शाहीर पठ्ठे बापूराव यांची आठवण करून दिली. श्रीहरी पाटील यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उस्फुर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा चंद्र संस्थेच्या सचिव सौ वैष्णवी पाटील यांनी केले. 

    कार्यक्रमासाठी रामा रघुनाथ पाटील, आजरा तालुका संघाचे माजी व्यवस्थापक विठ्ठल पाटील, आजरा साखरचे माजी कार्यकारी संचालक निवृत्ती अडकुरकर, विद्यमान संचालक गोविंद पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश पवार, माजी सरपंच लक्ष्मण अडकुरकर आदी मान्यवरांसह घाटकरवाडी, सुळेरान, धनगरमोळा आदी गावांतील ग्रामस्थ व काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment