आजरा : गोपाळ गडकरी / सी. एल. वृत्तसेवा
गंगा, चंद्र, साहित्य कला सेवा मंच घाटकरवाडी (ता. आजरा) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. घाटकरवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास बर्डेकर (माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, राज्यमंत्री दर्जा) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक सलीम मुल्ला उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीहरी पाटील व सौ. जिजाबाई श्रीहरी पाटील यांच्या लग्नाच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त श्रीहरी पाटील दांपत्याचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांनी आपल्या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे वाचन करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांत आनंद व अश्रूही तरळले. आपल्या अंगभूत कलेची झलक दाखवताना ८६ वर्षीय श्रीहरी पाटील यांनी राधे कृष्ण तमाशातील गण व राजा हरिश्चंद्रांचा वग गाऊन शाहीर पठ्ठे बापूराव यांची आठवण करून दिली. श्रीहरी पाटील यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उस्फुर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा चंद्र संस्थेच्या सचिव सौ वैष्णवी पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी रामा रघुनाथ पाटील, आजरा तालुका संघाचे माजी व्यवस्थापक विठ्ठल पाटील, आजरा साखरचे माजी कार्यकारी संचालक निवृत्ती अडकुरकर, विद्यमान संचालक गोविंद पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश पवार, माजी सरपंच लक्ष्मण अडकुरकर आदी मान्यवरांसह घाटकरवाडी, सुळेरान, धनगरमोळा आदी गावांतील ग्रामस्थ व काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment