पुरामुळे कोवाडमधील व्यापारी उध्वस्त, शेतीपिकांचे कोट्यावधीचे नुकसान, शेतकरी देशोधडीला - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2019

पुरामुळे कोवाडमधील व्यापारी उध्वस्त, शेतीपिकांचे कोट्यावधीचे नुकसान, शेतकरी देशोधडीला

तालुक्यातील सर्व मार्गे खुले, एसटीचे 35 लाखांचे नुकसान
पुराच्या तडाख्याने जमीदोस्त झालेले भातपिक.
चंदगड / प्रतिनिधी
गेल्या आठ-दहा दिवस पाण्याखाली असलेले चंदगड तालुक्यातील सर्वच मार्ग आज वाहतुकीसाठी खुले झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरीक आज बाहेर पडले. भितीच्या छायेतून लोक आज खऱ्या अर्थाने बाहेर पडले आहेत. गेले आठ दिवस एटी सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे चंदगड आगाराचे सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले आहे. आजही चंदगड-बेळगाव, चंदगड-गडहिंग्लज वगळता अन्य मार्गावर एसटी सेवा करण्याचे नियोजन केले जात होते. अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने त्याची पाहणी करुन बुधवारपासून एसटीसेवा सुरळीत होईल. पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले असून त्यातच घरांचीही पडझड झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. चंदगड तालुक्यात सर्वच गावांना कमी-अधिक प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. मात्र पुराचा सर्वांधिक फटका कोवाड गाव व बाजारपेठेला बसला आहे. अनेकांचे जगण मुश्किल बनल आहे. उत्पन्नाचे साधनच पुराने हिराऊन घेतल्याने आता जगायच कस? असा यक्ष प्रश्न व्यापाऱ्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. 
सद्यस्थितीला कोवाड बाजारपेठेतील पाणी नदीपात्रात गेले आहे. पुरामुळे कोवाड बाजारपेठेतील दुकानामध्ये चिखलांचे साम्राज्य पसरले होते. आज दिवसभर दुकानदार आपापली दुकाने स्वच्छ करण्यात गुंतले होते. बाजारपेठेतील औधष दुकाने, कापड दुकाने, फर्निचर, फोटो स्टुडिओ, किराणा, शॉपींग सेंटर, भांडी स्टोअर्स, स्विट मार्ट, कृषी सेवा केंद्र यासह अनेक दुकाने अचानक पाण्याखाली गेल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. जे छोटे-मोठे दुकानदार आहेत. त्यांचे सर्वस्व उध्वस्थ झाले आहे. सर्व कुटुंब दुकानावर अवलंबून होते, हे दुकानच पुरात बुडाल्याने आता जगायचे तरी कसा असा प्रश्न दुकानादारांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुकानासाठी बँकेचे अगोदर काढलेले पैसे भरायचे? की नवीन दुकान कसे उभे उभारायचे हा यक्ष प्रश्न दुकानादारांच्यासमोर आहे. पुरग्रस्त कुटुंबासोबत व्यापारी वर्गालाही पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी मोठ्या मदतीची गरज आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुरग्रस्त पाच गावांना दत्तक घेणार असल्याची घोषणा केली आहे. चंदगड तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वांधिक नुकसान झालेली कोवाड, कोनेवाडी व आसगाव हि तीन गावे दत्तक घ्यावी. जेणेकरुन या गावातील लोकांचा संसार पुन्हा नव्याने उभा राहील. 
दरम्यान मंगळवारी खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या. यावेळी सरकारच्या वतीने पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दोन्ही खासदारांनी चंदगडकरांना दिले. कोवाड येथे गडहिंग्लज पंचायत समिती उपसभापती विद्याधर गुरबे यांनी टँकरने पाणीपुरवठा केला. तसेच तेऊरवाडी येथील युवकांनीही कोवाड गावासाठी पाणीपुरवठा केला. आज दिवसभरात रणजित देसाई यांचे नातू सिध्दार्थ देसाई यांनी 15 डॉक्टरांची टीम कोवाड येथे पाठवून येथील लोकांची आरोग्य तपासणी केली. जीवनावश्यक वस्तु, स्वच्छतेसाठी हॅडग्लोज व तोंडाला बांधण्यासाठी मास्क पुरविले. पुरामुळे कोवाडमधील 27 घरे पुर्णत: तर 20 घरे अंशत: पडली आहे. घरे पडलेले पुरग्रस्त अद्यापही निवाऱ्याच्या शोधात आहेत. अशा नागरीकांना तातडीने निवाऱ्याची सोय करुन द्यावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे. कोवाडकर पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागले आहेत. पुन्हा उभे राहण्याची उमेद मनात असली तरी झालेले नुकसान कसे भरुन काढायचे व मनातील डाग कसा पुसायचा हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 
                                   ओलम साखर कारखान्याकडून पुरग्रस्तांची मदत...............
ओलम अँगो इंडिया (हेमरस शुगर) या कारखान्याकडुन पूरग्स्तांसाठी जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले. ओलम कंपनीचे बिझनेस हेड भरत कुंडल, व मुख्य शेतीअधिकारी सुधीर पाटील  यांनी कोवाड परिसरातील गावांच्या भेटी घेवुन पुरिस्थितीची पाहिणी केली. ज्या कुंटुंबाजे राहते घर पडलेले आहे, त्या कुंटुबाला जीवनावश्यक धान्य (साहित्य) वाटप केले. कोवाड परिसरातील कामेवाडी, निटूटूर, दुंडगे, राजगोळी बुद्रुक, कुदनुर, चिंचणे, तळगुळी, राजगोळी खुर्द या गावातील कुंटुबांना मदत देण्यात आली. 

No comments:

Post a Comment