चंदगड तालुक्यात अवघ्या १५ दिवसांत झाले होते ७ जवान शहीद.....या वीर जवानांच्या पराक्रमाला कालकुंद्री येथे मिळाला उजाळा!, वाचा, चंदगड लाईव्ह चा स्पेशल रिपोर्ट ! - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2022

चंदगड तालुक्यात अवघ्या १५ दिवसांत झाले होते ७ जवान शहीद.....या वीर जवानांच्या पराक्रमाला कालकुंद्री येथे मिळाला उजाळा!, वाचा, चंदगड लाईव्ह चा स्पेशल रिपोर्ट !


कागणी : एस. एल. तारीहाळकर / सी. एल. वृत्तसेवा 

      १९७१ च्या भारत - पाकिस्तानच्या युद्धात चंदगड तालुक्यातील सात जवान केवळ पंधरवड्यातच शहीद झाले होते. या संपूर्ण घटनेला कालकुंद्री (ता. चंदगड) येथे दि. ११ डिसेंबर 2022 रोजी उजाळा  मिळाला. या घटनेला ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. कालकुंद्री (ता. चंदगड) येथे परशराम सट्टूप्पा पाटील या शहीद जवानाच्या स्मारकाचे अनावरण  मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या निमित्ताने संपूर्ण घटनेला उजाळा मिळाला.

कालकुंद्री : स्मारक अनावरण कार्यक्रमात सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसह शहीद जवान परशराम यांचे भाऊ लक्ष्मण, पुतण्या परशराम, वहिनी सुनंदा, पुतणी शोभा, सून पल्लवी, विनोद पाटील, विलास शेटजी व अन्य मान्यवर

      पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत १९७० साली बांगला विचाराची आवामी लीग सत्तेत आली. यानंतर पाकच्या स्थापनेपासून वर्चस्व असलेल्या पंजाबी, पठाणी राज्यकर्त्यांना लीगचे यश खूपू लागले आणि पाकिस्तानमध्ये राजकीय असूरक्षितता निर्माण झाली. यानंतर पूर्व पाकिस्तानचा ताबा घेण्यासाठी पाकने सेना तैनात केली. 

कालकुंद्री : परशराम पाटील यांच्या स्मारक अनावरण प्रसंगी  एम. एन. पाटील, उपस्थित मान्यवर व त्यांच्या घरचे सदस्य.

         यावेळी बांगला विचाराच्या जनतेला स्वातंत्र्य देण्यासाठी माणुसकीच्या भावनेने  भारताने या युद्धात उडी घेतली. भारताच्या कोणत्याही भूमीसाठी ही लढाई न होता केवळ बांगला विचारांच्या जनतेला संरक्षण म्हणून या लढाईत  भारत सहभागी झाला होता. 

       याच युद्धामध्ये १९७१ मध्ये १ डिसेंबर ते २५ डिसेंबर या दरम्यान ७ जवान शहीद झाले.

तुडये : ११ डिसेंबर १९१७ रोजी शहीद शंकर मणगुतकर यांचा पुतळा अनावरण प्रसंगी वीर पत्नी व नातेवाईक व अधिकारी,         
इनसेटमध्ये शंकर मणगुतकर.

शहीद जवान असे..... 

     लान्सनायक अनिल सिपेकर (कौलगे, 1 डिसेंबर), शिपाई परशराम सट्टूप्पा पाटिल (कालकुंद्री, ११ डिसेंबर), नायक मारुती मडलगेकर (म्हाळेवाडी, ६ डिसेंबर), नायब सुभेदार दत्तात्रय आवडण (हलकर्णी, १० डिसेंबर), शिपाई दादू शिंदे (चंदगड, १७ डिसेंबर), शिपाई शंकर मणगुतकर (नागरदळे, ११ डिसेंबर), शिपाई मारुती सुळेभावकर (२५ डिसेंबर, किटवाड) असे ७ जवान शहीद झाले होते तर यापैकी कालकुंद्री येथील परशराम पाटील  यांना अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. तर शंकर हे १९ सप्टेंबर १९६५ रोजी बेळगाव सेंटर मध्ये भरती झाले होते.  ११ डिसेंबर १९७१  साली ते शहीद झाले. 

                       1971 च्या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर कागदपत्रावर सही करताना पाकिस्तानचे तत्कालीन सेनानी लेफ्टनंट जनरल नियाजी.
त्या वेळेला कोवाड सारख्या तसेच अन्य ठिकाणी बसेसच्या सुविधा सुद्धा नव्हत्या. बेळगाव इथूनच बस ये जा करत असे. या दरम्यान बहुतांश या वीर जवानांनी काही इयत्ता शिक्षण घेतले होते. त्यावेळेला बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीने मोठा इतिहास घडवला आहे. चंदगड तालुक्यातून जवळचे सेंटर असल्यामुळे सर्व जवान बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री सेंटर मध्येच भरती व्हायचे. या शहीद जवानांपैकी काही जणांचे विवाह तर काही महिन्यापूर्वी झाले होते.


परशराम पाटील आणि शंकर  मनगुतकर एकाच दिवशी शहीद

     नागरदळे येथील शंकर व कालकुंद्री येथील पर परशराम पाटील हे दोघे एकाच दिवशी शहीद झाले. भारत - पाकिस्तान या युद्धामध्ये केवळ दहा दिवसात चौघे तर त्यानंतर पंधरवड्यात दोघांनी मातृभूमीसाठी बलिदान केले. या संपूर्ण घटनेने चंदगड तालुका व बेळगाव मराठा  लाईट इन्फंट्री सेंटरही शोक सागरात बुडाले होते. मात्र त्यावेळी शत्रूला हरवल्याचा एक वेगळा अभिमान ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 


या युद्धावर एक नजर ! 

.....

१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानची शरणागती

.....

 १७ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक युद्धबंदी. 

.......

या  युद्धात भारताचे ३ हजार ९०० सैनिक शहीद

......

तर चंदगड तालुक्यातील ७ जवान शहीद

....... 

 पाकिस्तानचे ९ हजार सैनिक ठार  तर २५ हजर हुन अधिक सैनिक जखमी.

No comments:

Post a Comment