सोहळ्यावेळी लेखकव इतर सहकारी उपस्थित |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून विनावेतन अध्यापन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारीत किरण सुभाष चव्हाण लिखित विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आज मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी पार पडले.
आजच्या शिक्षण क्षेत्रातील विदारक सत्य परखडपणे मांडणारे आणि विनाअनुदानितच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे. राज्यात आज विनाअनुदानित शिक्षक अनेक वर्षे विनावेतन अध्यापनाचे काम करीत असून पगारविना अनेक समस्यांना या शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. अत्यंत बिकट अवस्थेत हे शिक्षक जगत आहेत,त्यांच्या कुटूंबाचीही परवड होत आहे. शिक्षणक्षेत्रातील विनाअनुदानित धोरण हे आजच्या शिक्षकांना मारक ठरत आहे. किंबहुना विनाअनुदानितच्या धोरणाला कंटाळून आजपर्यंत शेकडो विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. विनाअनुदानितच्या गंभीर प्रश्नांवर किरण चव्हाण यांनी ह्या पुस्तकातुन प्रकाशझोत टाकला आहे. बहुचर्चित अशा ह्या पुस्तकाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. आज मुंबई येथे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच मारुती चव्हाण, सुनील नाधवडेकर, पांडुरंग इंगळे, यशवंत गुरव, देवेंद्र गावडा उपस्थित होते.
No comments:
Post a Comment