चंदगड वनविभागाच्या वतीने "वणवा निर्मुलन मोहिम" या विषयावर कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2024

चंदगड वनविभागाच्या वतीने "वणवा निर्मुलन मोहिम" या विषयावर कार्यशाळा संपन्न

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्हयातील जंगलाचे १००० हेक्टर ते १५०० हेक्टर  क्षेत्र प्रति वर्षी आगीच्या भक्षस्थानी पडत आहे. त्यामध्ये चंदगड परिक्षेत्र, पाटणे परिक्षेत्रातील जंगलांचाही  समावेश आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागातील विविध, प्राणी, पक्षी, किटक, वृक्ष, वेली  यांच्या प्रजातीही त्यामुळे नष्ट होत आहेत. असा निष्कर्म जैवविविधता मंडळाच्या निरिक्षकांनी नोंदविला असल्याचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील सांगितले. ते सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) व वन विभाग परिक्षेत्र चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड येथील वनविभागाच्या कार्यालयात "वणवा निर्मुलन मोहिम" या विषयावर कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी चंदगड परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार भोसले होते. 

      वनपाल कृष्णा डेळेकर यांनी चंदगड परिक्षेत्रामध्ये असलेली वन वैविधता खूप समृद्ध आहे. त्याचे अपरिमित नुकसान हे वणव्यामुळेचं होते त्यासाठी सदरच्या क्षेत्राचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. श्री. पाटील म्हणाले, `रस्ते, पाणी, गटर इत्यादी पायाभूत सुविधांबरोबरच जल जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनाचे जतन करणे कामी सर्व सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज प्रामुख्याने आपल्यावर येऊन ठेपल्याचे सांगितले.`

        जंगलाला लागणारी आग ही मानवनिर्मितच असते त्यामुळे जनजागृती करणेची मोहिम वनविभाग व सरपंच परिषदेने प्रभाविपने राबवून त्याचे रूपांतर लोकचळवळी मध्ये करण्यासाठी सर्व सरपंचांनी झोकून देऊन काम करण्याचे अवाहन सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे राज्य सरचिटणीस राजू पोतनीस यांनी केले.

         चंदगड परिक्षेत्राचे वन अधिकारी नंद‌कुमार भोसले म्हणाले, आपल्याकडील १३८४७ हेक्टर क्षेत्र जंगल चे असून, त्यामध्ये लागणाऱ्या आगीमध्ये खाजगी क्षेत्रामधून येणाऱ्या आगीचे प्रमाण खूप आहे. सरपंच परिषदेने घेतलेल्या पुढाकाराने आगीवर नियंत्रण आणण्यामध्ये वन विभागाला मोलाचे सहकार्य मिळेल असा विश्वास वाटतो. टेहळणी टॉवर, ब्लॅक स्पॉट वर फ्लेक्स बोर्ड लावणे, जाळ पट्टे काढणे, गाईचर यांची यादी काढून सुचना देणे, जंगलालगतच्या खाजगी क्षेत्र धारक शेतकऱ्याला सुचना/नोटीस देणे, विद्यार्थ्यांच्यामार्फत जनजागृती रॅली काढणे. इत्यादी उपाययोजना यावेळी प्रभाविपणे राबविणे साठी सर्व वनपाल, कृष्णा डेळेकर, वर्षधा काणकेकर, चंद्रकांत पावसकर व वनरक्षक कर्मचारी यांनी नियोजन करण्याचे ठरले.  गतवर्षी पेक्षा या वषर्षामध्ये जळीत क्षेत्र कमी करण्यासाठीचा निश्चय सरपंच व वनविभाग यांनी यावेळी केला.

      यावेळी वाघोत्रेचे सरपंच मारुती गावडे यांनी `जंगलाला लागणारी आग थांबवणेसाठी, ग्रामदैवताला गा-हाणे घालण्याचे भीती व्यक्त करणारे तंत्राचाही वापर प्रत्येक गावाने करण्यास सांगितले.` जांबरेचे सरपंच विष्णु विश्राम गावडे यांनी `जंगलाना लागणाऱ्या आगीमुळे, वन्य प्राण्यांची घरे नष्ट होत आहेत. त्यामुळेच त्यांचे मानवी वस्तिमध्ये व पिकामध्ये वावर वाढला आहे. वन्य प्राणी व मानव हा संघर्ष थांबवण्यासाठी जंगलाना लावली जाणारी आग ही बाब सर्वांनी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.`

     प्रमुख पाहुणे म्हणुन  सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे प्रदेश  सरचिटणीस राजू पोतनीस, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इंजि जी. एम. पाटील, चंदगड तालुकाध्यक्ष आर. जी. पाटील, खजीनदार राजेंद्र  वैजू कांबळे(सरपंच ग्राम  पंचायत नांदवडे) इत्यादी उपस्थित होते. यावेळी, इनाम म्हाळुंगेचे सरपंच विठोबा गावडे, मिरवेलचे सरपंच तुकाराम महादेव सुतार, बुझवडेचे नामदेव कृष्णा सुकये, इसापूरचे सत्यवान देहू गवस मंगेश भोवर, उमगाव, विविध गावांचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ व निसर्गप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment