सामूहिक विज्ञानवादी दृष्टिकोनाची गरज - डॉ. शिवराम भोजे, ढोलगरवाडी येथे 44 व्या विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2018

सामूहिक विज्ञानवादी दृष्टिकोनाची गरज - डॉ. शिवराम भोजे, ढोलगरवाडी येथे 44 व्या विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे 44 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना आमदार श्रीमती संद्यादेवी कुपेकर व इतर मान्यवर.

कोवाड / प्रतिनिधी
वाढत्या मानवी उपभोगानुसार नैसर्गिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.  ज्यामुळे पर्यावरणही झपाट्याने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाने स्वार्थासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. विज्ञानाचा योग्य गोष्टीसाठी वापर होत नसल्याने पृथ्वीवर तापमान वाढ, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, नैसर्गिक संकटे अशा अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. यातून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. मानवी जीवनावर त्याचे परिणाम होत आहेत. त्यामुळे सामूहिक विज्ञानवादी दृष्टिकोनाची गरज आहे असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी केले. ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयात आयोजित केलेल्या ४४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी शिक्षण उपसंचालक नानासाहेब माने होते. आमदार संध्यादेवी कुपेकर व सभापती बबन देसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. बी. एल. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भोजे म्हणाले, ``विज्ञानाबरोबर माणूस सुधारला पाहिजे. अन्यथा विज्ञानाचा दुरुपयोग होतो. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. पण त्यासाठी प्रत्येकाकडे ऊर्जेची गरज आहे. विज्ञानामुळे मानवी प्रगतीला दिशा मिळाली. पण या विज्ञानाचा योग्य वापर होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले वाढत्या लोकसंख्येमुळे जंगल, वने नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. तापमान वाड होऊन हवेचे पाण्याचे प्रदूषण होऊ लागल्याने धोका निर्माण झाला आहे.``
आमदार कुपेकर म्हणाल्या, ``संशोधक देशाच्या प्रगतीचा एक घटक आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी वैज्ञानिक मानसिकता तयार करण्याचे काम विज्ञान प्रदर्शनातून होते. प्रा. एन. एस. पाटील म्हणाले, ``2018 हे वर्ष आपण जमीन सुपीकता वर्ष म्हणून साजरे साजरा करीत आहोत. पण आंतरराष्ट्रीय अन्न व शेती संघटनेच्या सन 2011 सालातील अहवालानुसार जगातील 25 टक्के जमीन नापीक झाल्याचे सांगितले. मुख्याध्यापक एस. आर. पाटी व तानाजी वाघमारे यांनी स्वागत केले. गटशिक्षण अधिकारी एस. एस. सुभेदार यांनी प्रास्ताविक केले. सकाळी आठ वाजता एम. एम. कुट्रे यांच्या हस्ते विज्ञान दिंडीचे उद्घाटन झाले. सभापती बबन देसाई यांच्या हस्ते उपकरणांचे उद्घाटन झाले. शैक्षणिक साहित्याचे उपसभापती विठाबाई मुरकुटे यांच्या हस्ते उद्घाटन व विद्या पाटील यांच्या हस्ते झाले. सरपंच कलाप्पा पाटील, जिल्हा परिषद सचिन बल्लाळ, रुपा खांडेकर, नंदीनी पाटील, मनिषा शिवनगेकर, टी. एस. सुतार उपस्थित होते. उत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकारी विलास कांबळे यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment