बोलीभाषा ही काव्याचा आत्मा आहे - सीमाकवी रवी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2019

बोलीभाषा ही काव्याचा आत्मा आहे - सीमाकवी रवी पाटील

पुणे येथील भोर येथे आयोजित "बदलते सांस्कृतिक पर्यावरण व मराठी कविता " या दोन दिवशीय  राष्ट्रीय चर्चासत्र प्रसंगी ते बोलताना कवी रवी पाटील

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
       कविता ही समाज मनाचा आरसा आहे. अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेत कविता, गझल, चारोळ्या असे विविध काव्यप्रकार रचणं अपेक्षित आहे. बोलीभाषांचं माधुर्य सर्वांसमोर यावं, हा चर्चा सत्राचा प्रयत्न आहे. बोलीभाषा ही काव्याचा आत्मा आहे. विविध ढंगातील बोलीची तऱ्हा व अदा न्यारी असते. बोलीचा सुंगध काव्याच्या रूपाने नवोदित कवीनी मांडाव्यात असे प्रतिपादन सीमाकवी रवी पाटील यांनी  केले. सवित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे व शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर -भोर  यांच्या संयुक्त विद्यमाने "बदलते सांस्कृतिक पर्यावरण व मराठी कविता " या दोन दिवशीय  राष्ट्रीय चर्चासत्र प्रसंगी ते बोलत होते. शंकरराव भेलके नसरापुर – भोर (पुणे) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
सीमाभागातील व्यथा, वेदनांचा हुंकार व सीमाभागातील कैफियत 'लढा ' ''सीमालढा हा सीमालढा, कोणी निर्मिला हा कोंडमारा, 'हाक ' या सर्व कवीतेतुन त्यांनी सिमावासीयांच्या व्यथा मांडल्या.                           या राष्ट्रीय चर्चासत्रात अ. भा. साहित्य परिषदचे सरचिटणिस, लेखक व कवी दशरथ यादव, कवी स्वामी निश्चलानंद, कवी अभिषेक अवचार (वाशिम), इस्रोचे शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. सुभाष नाईक (गुजराथ), राजेंद्र सोनावणे, कवी गजेंद्र सलादे, कवी वनशिव या कवीनी कविता सादरीकरण केल्या. " डिजिटल युगात वाचन संस्कृती रुजावी व काव्यवाचनातून जीवनाचे तत्वज्ञान आत्मसात करावे. साहित्य हे बदलत्या संस्कृतीचे प्रतिबिंब काव्यातून सहज प्रकट होत." असे मत ८७ व्या अ. भा. सा. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयराव कोलते यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार अध्यक्षस्थानी होते. कवयित्री अलका तालकर बीजभाषणातून कविता चर्चासत्राचा सार उलघडला.         
       प्राचार्य आर. व्ही. ढेरे म्हणाले, "सीमाप्रश्न साहित्यिकांनी समजून घेवून ही बोथट होत असलेली धार सीमा बांधवांना न्याय देण्यासाठी चळवळ उभी करावी. सीमाबांधव न्याय हक्कांची लढाई लढत असून राजकिय इच्छाशक्ती उभी राहिली तर सीमाप्रश्न सुटायला वेळ लागणार नाही". असे प्रखड मत व्यक्त केले. या राष्ट्रीय चर्चा सत्रात महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजराथ व दुसऱ्या दिवशी बेळगांव येथील बलभीम साहित्य संघाचे कवी शिवाजी शिंदे, रविंद्र पाटील, नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, दत्ता कांबळे  यांचा " कविता जनातल्या कविता मनातल्या " बहारदार काव्य मैफल रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील  ९३ प्राध्यापक सहभागी झाले होते.  यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. जगदिश शेवते यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. संदिप लांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विशाल पावसे यांनी मानले.


No comments:

Post a Comment