दौलतच्या आडवे येणाऱ्यांची गय नाही - गोपाळराव पाटील, चंदगड येथे पत्रकार परिषदेत माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2019

दौलतच्या आडवे येणाऱ्यांची गय नाही - गोपाळराव पाटील, चंदगड येथे पत्रकार परिषदेत माहीती

तालूका संघाने अजूनही पैसे भरून दौलत चालवायला घ्यावा, सहकार्य करू
चंदगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना गोपाळराव पाटील, ॲड. संतोष मळविकर व प्रदिप पवार.
चंदगड / प्रतिनिधी
 चंदगड  तालुका खरेदी विक्री  संघाने कारखाना सुरु करण्यासाठी 29 मार्चपर्यंत बँकेत पैसे भरावेत. आम्ही त्यांना सहकार्य करु. अन्यथा कारखाना सुरु होण्याच्या मार्गावर असताना कोणी आडवे आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दौलतचे जेष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी दिला. चंदगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना जिल्हा बँकेने अथर्व कंपनीला चालवायला दिला आहे. तालुका खरेदी विक्री संघाच्या बैठकीत जिल्हा बँकेच्या या निर्णयाविरोधात सहकार खात्याकडे तक्रार करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.या पार्श्वभूमीवर आज चंदगड येथे दौलत बचाव कृती समिती मार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
गोपाळराव पाटील पुढे म्हणाले, ``दौलत कारखाना अथर्व कंपनीच्या माध्यमातून सुरु होण्याच्या मार्गावर आहे. कामगार व शेतकरी यांच्या हितासाठी कोणीही आडवे येवू नये. तालुका संघाने सहकार मंत्र्याकडे तक्रार करण्याची भूमिका कारखाना सुरु होण्याला आडकाठी आणणारी आहे. त्यामुळे कारखाना सुरु होण्याला कोण आडवे येत होते. हि वस्तुस्थिती आता सर्वांच्या समोर येत आहे.  त्यावेळी तासगांवकर शुगर्सची साखर जप्त करण्यालाही राजेश पाटील यांचा पुढाकार होता. तालुका संघाच्या माध्यमातून कारखाना चालवायला घेण्याच्या निर्णयाबाबत आम्हाला बाजुला ठेवले आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा. आमची भूमिका कारखाना सुरु व्हावा अशीच आहे.``
दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर म्हणाले, ``कारखाना सुरु होण्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न आहेत. जिल्हा बँकेने अथर्व कंपनीला कारखाना चालवायला दिला आहे. मात्र तालुका संघाने या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुर्णत: कारखाना सुरु होण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे कारखाना सुरु होण्याच्या प्रक्रियेत आडवे येणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील. या निर्णयामुळे अथर्व कंपनीने कारखान्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली. तर त्याला जबाबदार तालुका संघ असेल असे सांगितले.``
कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोवार ``तालुका संघाच्या सहकार खात्याकडे तक्रार करण्याच्या निर्णयामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे अथर्व कंपनीने नकारात्मक भूमिका घेतली तर कारखाना सुरु होणार नाही. याला जबाबदार तालुका संघ असेल याचा विचार होण्याची गरज आहे. 1 एप्रिल 2019 पर्यंत कारखाना सुरु होण्याच्या हालचाली न झाल्यास कामगारांचा उठाव होईल असे सांगितले.`` यावेळी राजेंद्र पावसकर, अनिल होडगे, लक्ष्मण पाटील, दिलीप कदम, शफीयान मदार व देवदास पाटील उपस्थित होते.



No comments:

Post a Comment