पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसिलवर धडक, तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2020

पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसिलवर धडक, तहसिलदारांना निवेदन

पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी आज चंदगड बाजारपेठेतून मोर्चा काढला. मोर्चात सहभागी झालेले पोल्ट्रीधारक.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील अनेक तरुणांनी नोकरी मागे न लागता शेतीबरोबर पोल्ट्रीसाठी बँकांची कर्जे घेऊन व्यवसाय सुरू केला. या कर्जातून पक्ष्यांना लागणारे खाद्य व औषधे या सर्वांचा होणारा खर्च बँकांची कर्जे व त्यावरील व्याज, लाईट बिल, कामगारांचा पगार यातून केला जातो. मात्र सद्यस्थितीला कोरोना व्हायसर कोंबड्यामुळे पसरला जातो. असा अकारण गैरसमज सोशल मीडिया व चर्चेद्वारे पसरल्याने बाजारातील कोंबड्यांचे दर गडगडले. परिणामी पोल्टीधारक शेतकरी अडचणीत येवून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे यातून सावरण्यासाठी सरकारने पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी आज चंदगड तालुक्यातील कुक्कुटपालन मालक चालक सेवा संघाच्या वतीने चंदगड तहसिलवर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांना दिले.
पोल्ट्रीधारक शेतकरी तहसिलदारांना निवेदन देताना. 
 प्रारंभी चंदगड येथील रवळनाथ मंदिरात कुक्कुटपालन मालक चालक सेवा संघाची बैठक झाली. यामध्ये कोरोना व्हायरस कोंबड्यामुळे होते. या गैरसमजामुळे पोल्ट्रीधारकांचे नुकसान झाले. त्यामुळे या विरोधात लढा देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. बैठकीला जमलेल्या पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी यावेळी चंदगड येथील बाजारपेठेतून मोर्चा काढून चंदगड तहसिलवर धडक दिली. यावेळी आपली व्यथा चंदगड तहसिलदारांच्यासमोर मांडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
निवेदनात म्हटले आहे की, चंदगड तालुक्यात दोनशे ते अडीचशे पोल्ट्री फार्म झाले. या सर्वातून सात ते साडेसात लाख पक्षी संगोपन केले जाते. 40 ते 45 दिवसात एकेक बँच तयार होते. हे पक्षी गोवा व कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात. हे सर्व भागवून काही शिल्लक रक्कम शेतकरी आपल्यासाठी खर्च करतो असे चक्र चालू असते. व्यवसायात फार मोठा नफा नसला तरीही रोजीरोटीचा हा व्यवसाय केला जातो. कोरोणा व्हायरस कोंबड्याद्वारे पसरला जातो असा गैरसमज सोशल मीडिया व चर्चेद्वारे पसरल्याने बाजारातील कोंबड्यांचे दर गडगडले. धुलीवंदन पासून तर चक्क शंभर रुपयाला पाच कोंबड्या विकल्या गेल्या आहेत. कोरोणाचा आपल्या जिल्ह्यात मागमूसही नाही. तरीही केवळ याचा बावु झाल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. या नुकसानीमुळे पोल्ट्री धारक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने चंदगड तालुक्यातील पोल्ट्रीचे पंचनामे करावे व पोल्ट्रीधारकांना पक्षांच्या संख्येनुसार योग्य ती भरपाई द्यावी. जेणेकरून पोल्ट्रीधारक शेतकरी बँकेच्या कर्जातून मुक्त होण्यास थोडीफार मदत होईल. अशा आशयाचे निवेदन चंदगड तालुक्यातील पोल्ट्री धारकांनी तहसिलदार विनोद रणवरे यांना दिले. मोर्चामध्ये कुक्कुटपालन मालक चालक सेवा संघाचे अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष दिपक पाटील, सेक्रेटरी बाबुराव पाटील, खजिनदार संजय ढेरे, अंकुश गवस, प्रल्हाद पाटील, रामु पार्से, जयसिंग पाटील, राजू पाटील, शशिकांत पाटील, गणेश फाटक, विलास पाटील, राजेंद्र बोकडे दोनशे पोल्ट्रीधारक सदानंद आवटे, एस. आर. देशमुख, अडकुरचे श्री. देसाई, नामदेव गावडे, राजेंद्र बुवा, संतोष पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक पोल्ट्रीधारक सहभागी झाले होते.  

                      कोल्हापूर येथे पालकमंत्री, खासदार व आमदारांची सोमवारी घेणार भेट....................
कोरोना व्हायरस व कोंबड्याबाबत गैरसमज पसरल्याने पोल्ट्रीधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. कवडीमोल भावाने कोंबड्या विकण्याची वेळ आली आहे. काहीनी तर कोंबड्या जिवंत फुकटही दिल्या आहेत. त्यामुळे पोल्टीधारकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक व चंदगडचे आमदार यांची कोल्हापूर येथे सोमवारी भेट घेवून नुकसान भरपाई देण्याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment