नंदकुमार ढेरे / चंदगड प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात केवळ ४० पोलिसांना जमावबंदी आटोक्यात आणणे शक्य नसल्याने आता गावागावातील ग्रामपंचायतींनी पोलिसांची भूमिका वठवली आहे. प्रांताधिकारी यांनीही पूर्ण अधिकार ग्रामपंचायतीला दिले आहेत. सरपंच हाच 'त्या' गावाचा काही दिवसाचा फौजदार असल्याने त्याला सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
लोकांनीही आता कोरोना विषाणू ची धास्ती घेतली आहे. कोरोनामुळे काहीसे आज गुढी पाडवा सणावर विरजण पडले. किराणा मालाची दुकाने बंद राहिल्याने अनेकांनी सण साध्या पद्धतीने साजरा केला. पोलिसांनीही वर्षाचा पहिला सण असल्याने नारमाईची भूमिका घेत कुणालाही प्रसाद दिला नाही. अत्यंत गरजेचे काम असेल तरच रस्त्यावरून जाण्यास देत होते. बाहेरील शहरातून आलेल्या चाकरमान्यांची कसून आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांच्या हाताच्या मनगटावर होम कोरोन टाईन चे शिक्के मारण्यात आले.
पोलीस बळ कमी पडत असल्याने आता गावातील तरुण विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक ठेवत आहेत. ग्रामपंचायतीच्या आदेशाने फिरणाऱ्यांची झाडा झडती घेतली जात आहे. गप्प गुमान घरी बसा, पुन्हा रस्त्यावर दिसला तर याद राखा असा दम भरला जात आहे. यामुळेच पोलिसांवरील काही प्रमाणात ताण कमी झाला.
तालुक्यातील सर्वच गावांना जोडणारे रस्ते ओंडकें, झाडे आडवी पाडून बंद केल्याने उगाच फिरणाऱ्यांची संख्या आज दिवसभरात रोडावली. त्यातच पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते.
आपल्या जिल्ह्यात आणि भागांत कोरोना चा एकही रुग्ण नसल्याने कुणाच्याही चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली न्हवती. घरात बसून वेळ जात नसल्याने अनेक कुटुंबांनी दूरदर्शन आणि व्हाट्सअप मधून वेळ घालवला. खासगी वैद्यकीय सेवा बंद राहिल्याने रुग्णांचे हाल झाले. तसेच जीवनावश्यक वस्तू मिळल्या नसल्याने नागरिकांचे हाल झाले. चंदगड शहरासह तालुक्यातील अडकुर, तुर्केवाडी, हलकर्णी, हेरे, तुडये, कोवाड, राजगोळी, कुदनुर, कालकुंद्री, पाटणे फाटा, शिनोळी या मोठया लोक संख्येच्या गावांसह छोटी खेडी- वाड्या वस्त्यांमध्ये सामसूम होते.
No comments:
Post a Comment