तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोनाचा फटका, चंदगड तालुक्यातील शेतकऱ्याचे कोट्यावधीचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2021

तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोनाचा फटका, चंदगड तालुक्यातील शेतकऱ्याचे कोट्यावधीचे नुकसान


राजेंद्र शिवनगेकर - माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

        कोट्यावधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग  दुसऱ्या वर्षीही फटका बसला आहे.  काजू उत्पादक शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत बदलणारे हवामान, दाट धुक्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी व काजू कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

         दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काजूचा साठा होता.  दरवर्षीच्या जमाखर्चाचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी काजू उत्पादन चांगले होईल या आशेने मुलांची लग्ने जमवली आहेत. यासाठी शेतकर्यानी तसेच काजू खरेदी व्यापारी व कारखानदारानीही बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत. काजू बागांमध्ये दिवसभर फिरून दोन किलो काजू जमा झाली नसल्याने मजुरीही मिळालेली नाही. तसेच काजू देतो असे सांगून व्यापार्‍यांकडून  शेतकऱ्यांनी काजु पोटी ॲडव्हान्स रक्कम उचलली आहे. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे.  गेल्या वर्षी काजू बी ला प्रति किलो ७०  ते ९० रुपये दर होता. आणि काजू उत्पन्नही चांगले होते यावर्षी काजू बी उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति किलो ९० ते ११० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

            काजू उत्पादन घटल्याने काजू कारखानदारी अडचणीत आले आहेत.  छोटे कारखानदार कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत.आर्थिक मंदी जून अखेरपर्यंत राहिली तर मोठ्या कारखानदारांना याचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना बसणार आहे. एकंदरीत कारखानदार, व्यापारी, शेतकरी, मजूर अडचणीत येणार आहेत. 

         केळी,द्राक्षे कापूस,आदी पिकांची निसर्गाने हानी झाली तर शासन नुकसानभरपाई देते मात्र राज्याच्या कोकण पट्टट्यातील काजू उत्पादकांना भरपाई मिळत नाही. गेल्या वर्षी कोकणातील काजू उत्पादकांना शासनाने नुकसानभरपाई दिली होती, त्याच प्रमाणे कोकणशी संलग्न असणाऱ्या चंदगड,आजरा,गडिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी बळीराजा, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी केली आहे.

                मद्यार्क निर्मितीला  परवानगी द्यावी              

चंदगड तालुक्यात सरासरी दहा हजार टन काजू बी चे तर ४२ हजार टन काजू बोंडाचे उत्पादन होते. काजू बोंडावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्मितीला चालना न मिळाल्याने हे काजूबोंड शेतातच कुजत आहे. त्यामुळे ही काजू बोंडे उपयोगात आणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी शासनाने  मद्यार्क निर्मितीला परवानगी देण्याची मागणी होत आहे. 



No comments:

Post a Comment