कालकुंद्रीची माहेरवाशिन पतीराजासह पाकिस्तानच्या बॉर्डरवर! कशासाठी? वाचा चंदगड लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट! - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2022

कालकुंद्रीची माहेरवाशिन पतीराजासह पाकिस्तानच्या बॉर्डरवर! कशासाठी? वाचा चंदगड लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट!

खर्दुंगला या उंच पर्वतावर पोहचलेले स्नेहल व राहुल.

कागणी : एस. एल. तारिहाळकर / सी. एल. वृत्तसेवा

           कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कल्लाप्पा कोले यांची कन्या व शिंदोळी (ता. बेळगाव) या गावच्या सूनबाई  सौ. स्नेहल मंगण्णावर या आपले इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असणारे पती राहुल रामचंद्र मंगण्णावर (मुळगाव - शिंदोळी, सध्या रा. टिळकवाडी, बेळगाव) यांच्यासह रॉयल एनफिल्ड 350 सीसी या टू व्हीलर वरून सोलो रायडिंग करत पाकिस्तान बॉर्डरवरील तुर्तक व चीन या देशाची बॉर्डर असणाऱ्या  पेंगाँग या गावात पोहचल्या. 

पाकिस्तानच्या सीमेवर भारताच्या शेवटच्या गावात पोहचलेले स्नेहल व राहुल.

            सीएनजी गॅस भारतातच तयार व्हावा, विदेशावर असणारे अवलंबित्व कमी व्हावे, या केंद्र सरकारच्या धोरणाबाबत जागृती करत त्यांनी हा जागृतीपर प्रवास केला. पाकिस्तान आणि चीन या देशांच्या सीमेपर्यंतचे अंतर हे ४ हजार ५००  किलोमीटरहून अधिक आहे. तर तुर्तक हे गाव समुद्रसपाटीपासून १८,५०० फूट इतक्‍या उंचीवर आहे. केंद्र सरकार ला २०३० पर्यंत सीएनजी गॅसमध्ये भारत देश स्वयंपूर्ण करावयाचा आहे. या केंद्र सरकारच्या धोरणाबाबत त्यांनी  सोलो रायडिंगसह जनजागृती यशस्वी केली. ते शनिवार दि. २१ मे पासून परतीच्या मार्गावर आहेत. दिनांक ३० एप्रिल पासून त्यांचा बेळगाव मधून  प्रवास सुरू झाला.

जागृती मोहिमेवर असलेले स्नेहल व इंजिनियर राहुल मंगण्णावर दांपत्य.

              २२ दिवस जागृतीसह प्रवास करत युद्ध भूमी जम्मू-काश्मिर पर्यंत पोहचले. जाता-येता असा सुमारे १० हजार किलोमीटरचा प्रवास त्यांना पूर्ण करावा लागणार आहे. भारतात पिकणाऱ्या हत्ती गवत व अन्य विविध प्रकारच्या पाल्यापासून पासून सीएनजी गॅस निर्मिती करून भारत देश स्वयंपूर्ण बनावा, असे धोरण केंद्र सरकारचे आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड कंपनी (एम. सी. एल) प्रयत्नशील आहे. २०३० पर्यंत सीएनजी गॅसमध्ये भारत देश स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. याबाबत जागृती सुरू आहे. मंगण्णावर दांपत्याचे सध्या टिळकवाडी येथे वास्तव्य आहे. हे दांपत्य बेळगाव येथून 30 एप्रिल रोजी जगृतीपर भारत भ्रमंतीला निघाले होते.  

गावाशेजारील लोकांना माहिती देताना स्नेहल व राहुल.

           बेळगाव, नाशिक, सुरत, उदयपूर, चित्तोरगड, अहमदाबाद,  जयपूर, शिमला, मनाली, जम्मू काश्मीर, लडाख, पाकिस्तानची सीमा तूर्तक व चीन या देशाची सीमा पेंगाँग या ठिकाणापर्यंत दुचाकीवरून सोलो रायडिंग करत २२ दिवस जागृती केली. त्यांनी आपल्या प्रवासात विविध राज्यातील गावांमध्ये लोकांना, विद्यार्थ्यांना भेटून भारत देश सीएनजीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आवश्यक उपलब्ध साधनांतून कसे शक्य आहे, याची माहिती दिली. त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. याला अनेक राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

              राहुल हे बेळगाव येथे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून उद्यमबाग येथील एका कंपनीत रिजनल हेड   म्हणून कार्यरत आहेत,  तर स्नेहल या बेळगाव येथेच ऑनलाईन बिझनेस मध्ये कार्यरत आहेत. सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प बेळगाव येथेही सुरू आहे तसेच कोवाड - नेसरी मार्गावर तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) जवळही सुरू आहे. ऊन, वारा, वादळ, पाऊस या साऱ्यांचा संघर्ष करत पाकिस्तानच्या सीमेवरून शनिवार दि. २१ रोजी परतीच्या मार्गावर  असलेल्या स्नेहल व राहुल   यांच्या कपल सोलो रायडिंग च्या माध्यमातून सुखदायी प्रवासासाठी चंदगड लाईव्ह टीमकडून खूप खूप शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment