कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील किटवाड धरणाच्या
कडेला असलेल्या काटे शिवारात विज पडल्याने उभ्या ऊस पिकाने पेट घेतला. त्यामुळे वाय.
एस. पाटील या शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले.
काल दिनांक 5 रोजी सायंकाळी साडेचार वाजता
कर्यात भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस चालू होता. यावेळी किटवाड धरण क्रमांक एकजवळ
वाय. एस. पाटील यांच्या शेतातील उभ्या पिकात कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासह विजेचा
लोळ ऊसावर कोसळला. त्यामुळे जाग्यावर खड्डा पडून क्षणार्धात उसाने पेट घेतला. यावेळी
केवळ पन्नास फूट अंतरावर बाजूचे शेतकरी तानाजी पांडुरंग पाटील यांचे कुटुंबीय व
त्यांच्या शेतातील ऊस तोड करणारी आतवाड येथील टोळी जेवण करून थांबले होते. वीज
कोसळतानाचा आवाज एकून महिलांनी भीतीने किंकाळ्या फोडल्या. मात्र प्रसंगावधान राखून
ऊस टोळीने पेटणारा उस मोठ्या प्रयत्नाने विझवला. अन्यथा किमान सात एकर ऊस आगीच्या
भक्ष्यस्थानी पडला असता. या विजेच्या आवाजाने सुमारे पाच ते सहा किलोमीटर परिसर
दणाणून गेला. यानंतर काही वेळातच पावसाने हजेरी लावल्याने ऊस वाहतूक मात्र खोळंबली.
No comments:
Post a Comment