निपाणी येथे शनिवारी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, सर्वपक्षीय, धर्मीय व भाषिकांकडून मराठीचा जागर - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2019

निपाणी येथे शनिवारी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, सर्वपक्षीय, धर्मीय व भाषिकांकडून मराठीचा जागर



श्रीकांत पाटील / कालकुंद्री
निपाणी येथे 19  20 जानेवारी 2019 रोजी संपन्न होणाऱ्या निपाणी भाग मराठी साहित्य संमेलनाची तयारी शिगेला पोहोचली आहे. यशस्वीतेसाठी साहित्यिक व साहित्यप्रेमी सह सर्वपक्षीय, सर्व धर्मीय व सर्व भाषिकांची मांदियाळी सरसावली आहेत. निपाणीसह सीमाभाग, कागल, कोल्हापूरपर्यंत दहा वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या निपाणी साहित्य संमेलनाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
संमेलनाचे उद्घाटन शनिवार (ता. 19) चार वाजता आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते तर ज्येष्ठ साहित्यिका व पुरोगामी कार्यकर्त्या सौ. प्रतिभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, विलास गाडीवड्डर, उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी दुपारी दोन ते चार पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी होणार आहे. श्रीमंत दादाराजे निपाणीकर व एस. ए. मुल्ला यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते दिंडीचा शुभारंभ होईल. दुसऱ्या सत्रात सायंकाळी सात वाजता डॉक्टर उमेश उबाळे (अमरावती) यांचा गझल रंग हा कार्यक्रम होणार आहे.
चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी निपाणी येथे साहित्य संमेलनस्थळी भेट देवून माहीती घेतली. त्यावेळी उपस्थित साहित्य संमेलनाचे पदाधिकारी, चंदगड तालुका पत्रकार संघ व चंदगड लाईव्ह न्युजची टीम. 
दिनांक २० रोजी सकाळी ८ वाजता शंतनू कुलकर्णी यांचे `स्वप्नातून सत्याकडे` या विषयावर व्याख्यान होईल. रात्री ९.३० वाजता डॉ. कृष्णा इंगोले सांगोला व डॉ. कृष्णात खोत यांचे मराठी साहित्यातील कष्टकरी शेतकरी वर्गाचे चित्रण विषयावर राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होईल. ११.३० वाजता आप्पासाहेब खोत यांचे कथाकथन. दुपारी दोन वाजता संतश्रेष्ठ गाडगेबाबा जीवन दर्शन विषयावर नवनाथ शिंदे यांचा एकपात्री प्रयोग. सायंकाळी ४ वाजता प्रमोद कोपर्डे (सातारा) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन तर सायंकाळी ६ वाजता ओमकार ईटेकरी व समूह निपाणी यांचा गोंधळी कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनात विविध विषयावरचे ठराव मांडले जाणार आहेत. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष साहित्यिक प्रा. अच्युत माने यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानगणी पटेल, विजय मेत्रांनी, विठ्ठल वाघमोडे, गोपाळ नाईक, राजेश शेडगे, सुधाकर सोनाळकर, शरद कांबळे, निरंजन कमते, विभावरी खांडके,  उदय शिंदे, जयराज मिरजकर, असलम शिकलगार, हरीश तारळे, गजानन चव्हाण, उज्वला सातपुते, एस. एस. ढवणे,  आनंद संकपाळ, प्रा. आय. एन. बेग आदींसह कार्यकर्ते झपाटून कामाला लागले असून साहित्य रसिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
श्रीकांत पाटील, कालकुंद्री प्रतिनिधी



No comments:

Post a Comment