कालकुंद्री किटवाड रस्त्याची दुरावस्था, पाच वर्षे आश्वासने, आंदोलने, निवेदनांना केराची टोपली - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2019

कालकुंद्री किटवाड रस्त्याची दुरावस्था, पाच वर्षे आश्वासने, आंदोलने, निवेदनांना केराची टोपली

कालकुंद्री ते किटवाड या चार किमी रस्त्याची झालेली दूरावस्था,रस्त्यावर बिनधास्त फिरणारे मोर.
कालकुंद्री / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यातील कालकुंद्री ते किटवाड या चार किलोमीटर रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधीनी पाच वर्षे केवळ आश्वासनेच दिली असून आंदोलने व शेकडो सहयांनी दिलेल्या निवेदनांना  संबंधित विभागाने केराची टोपली दाखविण्यात आल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत . 
कालकुंद्री ते किटवाड हा चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचा रस्ता असून किटवाड च्या पुढे हांदिगणुर मार्गे बेळगाव ला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे .कृष्णा खोरे योजनेतील किटवाड नजीकची दोन धरणे व पावसाळ्यात धरणाच्या ओव्हर फ्लो पाण्यामुळे निर्माण होणारा धबधबा पाहण्यासाठी इकडे पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. तथापि बारमाही रस्ता रस्त्याअभावी तिकडे पर्यटक फिरकत नाहीत. वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद रस्ता म्हणून मंजूर झालेल्या रस्त्याला दोन किमी चे खडीकरण व कालकुंद्री कडील एक किमी चे डांबरीकरण या पलीकडे अद्याप काही झालेले नाही.  पाच वर्षांपूर्वी झालेल्या डांबरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यासाठी किमान पाच वेळा ग्रामस्थांना घेऊन खासदार यांची भेट घेतली तथापि आश्वासना पलीकडे काही पदरात पडले नाही. अशी खंत सामाजिक कार्यकर्ते तानाजी पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केली. सध्या पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्हा परिषद सदस्य अॅड. हेमंत कोलेकर यांना निवेदन दिल्यानंतर रास्ता काम मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यात धरणाच्या सांडव्याचा अडथळा असून त्यावर सध्या दुचाकी जाऊ शकेल असे साकव बांधण्यात आले आहे. तथापि मोठी वाहने पलिकडे जातील अशी व्यवस्था करण्याची दोन्ही गावातील ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. एकंदरीत अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या बांधणीसाठी भाजप व चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

No comments:

Post a Comment