संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज पहाटे तीन वाजल्यापासून मेघगर्जनेसाठी ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बागिलगे येथील तुकाराम गोपाळ पाटील या शेतकऱ्याच्या गवत गंजीवर पहाटे वीज पडल्याने गवत गंजी (व्हळी) जळून खाक झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या तोंडावरच वर्षभर जनावारांच्या चाऱ्याची केलेली सोय वीज पडून जळाल्याने जनावारांच्या सुक्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीजांच्या कटकडाटासह सुमारे तासभर पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. उन्हाळभर उष्म्याने होरपळणाऱ्या नागरीकांना पावसामुळे गारवा अनुभवला. पाऊस लांबणार असल्याचे अंदाज हवामान खाते वर्तवत होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मान्सुनच्या पूर्वसंध्येला वळीव पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून धुळवाफ पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. उन्हाळभर घरी असणारे शेतकरी कुटुंबीय या पावसामुळे आज दिवसभर शेतात दिसत आहेत. त्यामुळे संपुर्ण शिवार माणसांनी फुलला आहे.
No comments:
Post a Comment