जीवन संस्कारक्षम होण्यासाठी वाचन प्रक्रिया महत्त्वाची--शशिकला पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2019

जीवन संस्कारक्षम होण्यासाठी वाचन प्रक्रिया महत्त्वाची--शशिकला पाटील

गूडेवाडी येथे ग्रंथप्रदर्शन
गूडेवाडी ता.चंदगड येथे रणजीत वाचनालयात आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना शशिकला पाटील, बसलेल्या सरपंच संजीवनी पाटील, सरिता पाटील आदी 
चंदगड / प्रतिनिधी
सृजनशील माणूस तयार करण्यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे,  वाचनाने माणसाला आनंद मिळतो. माणसाची प्रगती होते .माणसाचं जीवन  संस्कारक्षम होण्यासाठी वाचन प्रक्रिया महत्वाची आहे. आज संस्कारक्षम माणूस घडण्यासाठी थोरामोठ्यांच्या आदर्श लहानपणापासूनच बाल मनावर बिंबवणे ही पालकांची जबाबदारी असून सुजाण नागरिक बनवण्यास  पुस्तकेच आदर्श ठरू शकतात यासाठी वाचन प्रक्रिया महत्वाची आहे. वाचनाकडे आजचा बाल वर्ग आणि तरुण वर्ग आकर्षित व्हायला पाहिजेत असे मत बालसाहित्यिका शशिकला पाटील यांनी व्यक्त केले. गुडेवाडी (ता. चंदगड) येथे रणजित वाचनालयाच्या वाचन प्रेरणा उपक्रमा निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून  बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे  संस्थापक संभाजी कोकितकर होते.
 वाचन प्रेरणा दिनानिमित्त  खुले ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी  राजेंद्र शिवणगेकर  यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले . ग्रंथपाल संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले .
 शशिकला पाटील पूढे म्हणाल्या माणसाचं जीवन समृद्ध होण्यासाठी वाचन महत्त्वाचे  आहे.आजच्या विज्ञान युगात मोबाईल मुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तके ही नेहमी आदर्श ठरत आली आहेत  आजच्या तरुण वर्गाला सुसंस्कृत मार्गावर आणण्यासाठी मोबाईल चा  गैरवापर टाळून आज यूट्यूब च्या माध्यमातून पुस्तके  वाचता येतात यासाठी आजच्या तरुण वर्गाने मोबाईलचा गैरवापर टाळावा आणि खऱ्या अर्थाने वाचनसंस्कृती जोपासावी.  आजच्या बालमनावर गोष्टीरूपातून चांगल्या संस्काराची बीजे रुजवली  तर   हीच बालके उद्या देशाची आदर्श नागरिक  बनतील  असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर  ग्रंथप्रदर्शनाचे उध्दघाटक राजेंद्र शिवणगेकर यांनी  साहित्यिकांच्या पुस्तकांना वाचकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्यामुळे अनेक पुस्तके प्रकाशकाकडे पडून आहेत. दर्जेदार साहित्यिकांचे पुस्तक वगळता अन्य साहित्यिकांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी आपला फावला वेळ पुस्तक वाचनात घालवावा .जेणेकरुन नव साहित्यिकाना प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले . यावेळी सरपंच संजिवनी पाटील. ग्रंथालयाचे सदस्य. सरिता वर्षे, गुलाब पाटील, अर्जुन पाटील, अशोक पाटील,  तानाजी पाटील,  जनाबा वर्पे, पांडुरंग पाटील, शंकर पाटील विद्यार्थी व ग्रामस्थ होते. आभार  सचिव ईश्वर गणेश आवडण यांनी मानले.



No comments:

Post a Comment