हेरे सरंजाम जमिनीवरील भोगवटदार वर्ग दोनची अट शिथील, चंदगड तालुक्यातील ४७ गावांना होणार लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2019

हेरे सरंजाम जमिनीवरील भोगवटदार वर्ग दोनची अट शिथील, चंदगड तालुक्यातील ४७ गावांना होणार लाभ


नंदकुमार ढेरे, चंदगड
चंदगड तालुक्यातील ४७ गावे हेरे सरंजाम वतनाच्या अंमलाखाली होत्या. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करून त्या शासनाच्या १ - क ऑनलाईन प्रणालीमध्ये खुल्या होऊन मिळाव्यात. यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने व मंत्रालय स्तरापर्यत लढा उभा केला होता. मात्र गेली 25/30 वर्षे या लढ्याला यश आले नव्हते. अखेर आज जिल्हाधिकारी  दौलत देसाई यानी या जमिनीवर असलेल्या अटी शिथील केल्याने जवळपास पंधरा हजार शेतकरी कुटूंबाना या निर्णयाचा लाभ होणार आहे. 
तालुक्यातील ८० टक्के शेतजमिनी हेरे सरंजाम प्रकारच्या वर्ग २ इनामी स्वरूपाच्या असून त्यामधील अंदाजे ४७ गावे ही सरंजाम वतनाच्या जमिनी पूर्वीपासून सरकार नोंद कमी करून मालकी हक्काने दिलेल्या आहेत . शासनाने २००१ मध्ये उपयोगीकरणासाठी खुल्या करून जमिनी मिळकती लोकांना मालकी हक्काने दिलेल्या आहेत . शासनाच्या दप्तरी वर्ग २ नमूद असल्याने सर्व जमिनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ब्लॉक करून ठेवल्या आहेत.गट खुले करण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त यांनी तहसीलदार यांना दिलेली असताना हेरे सरंजाम सिलिंग ॲक्ट जमिनी खुल्या करण्याची जबाबदारी आपल्यावर नसून ती उपविभागीय अधिकारी , गडहिंग्लज यांची असल्याचे कार्यालयातून सांगितले जात होते.त्यामुळे शेतकर्याची मोठ्या प्रमाणावर धावपळ व्हायची  . तालुक्यात एकूण हेरे सरंजाम , पाटील वतन , काझी वतन , कुलकर्णी परगाना , सिलिंग , कूळ कायदा अशा अनेक प्रकारच्या वर्ग २ च्या जमिनी असून संपूर्ण तालुका ८० टक्के शेतजमिनी या वर्ग २ खाली येतात . उर्वरित १० टक्के जमिनी देवस्थान व म्हारकी वतनाच्या आहेत . उर्वरित १० टक्के जमिनी या वर्ग १ खाली येतात त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाची फार मोठी अडचण झाली आहे . वर्ग २ गट खुला करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लोकांना तालुक्याच्या ठिकाणी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागल्या होत्या  . तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सेवा सोसायट्या , पतसंस्था व इतर बँका यांचेकडून वर्ग - २ च्या अटीमुळे कर्ज पुरवठा बंद केल्यामुळे तालुक्यातील जनता सावकारी फाश्यात अडकली होती.आता या निर्णयामूूळे शेतकऱ्यांना बॅका,पतसंस्था, सेवासंस्था, व इतर ठिकाणी जमिन तारण  कर्जे लवकर उपलब्ध  होणार आहे. 

            निर्णयामूळे शेतकऱ्यांना लाभ होणार - सभापती बबन देसाई
सात बारा उतार्यावर हेरे सरंजाम अट असल्यामुळे 47 गावातील नागरिकांना जमिनीवर कर्ज,काढता येत नव्हते किंवा जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते. शेतकर्याजवळ जमिनी असूनही त्याची प्रगती खुंटली होती.हेरे सरजांम च्या जमिनीवरील अट शिथील करून गट खूला करावा यासाठी पंचायत समितीच्या बैठका मधून ठरावही केले होते.सर्व शेतकर्यानी दिलेल्या लढ्याला आज यश आल्याचे पंचायत समिती सभापती बबनराव देसाई यांनी सांगितले. 

                              कर्ज मिळण्यातील अडचण दुर - भिमराव चिमणे - सचिव
तालुक्यातील 47 गावातील शेतकर्याना "हेरे सरजांम"अशा नोंदी सात बारा उताऱ्यावर असल्याने त्याना सेवा संस्थेमधून कर्जे ही देता आली नाहीत त्यामुळे शासनाच्या कर्ज माफीचा लाभ ये शेतकर्याना घेता नाही.मात्र जिल्हाधिकारी यानी या जमिनी बाबत घेतलेला निर्णय या शेतकऱ्यांच्या प्रगतीत महत्वाचा ठरणार असल्याचे भावेश्वरी-दौलत विकास सेवा संस्थेचे सचिव भिमराव चिमणे यांनी सांगितले. 

                शेतकऱ्यांच्या लढ्याला यश - माधव मंडलिक (अध्यक्ष, हेरे सरजांम कृती समिती) 
"हेरे सरजांम"ची अट शिथील व्हावी म्हणून शेतकरी वर्गाने दिलेल्या लढ्याला आज यश आले.


No comments:

Post a Comment