कालकुंद्री (प्रतिनिधी)
चंदगडच्या पश्चिमेकडील जंगल भागात वसलेल्या किल्ले पारगड, मिरवेल, नामखोल, इसापूर भागातील नागरिकांची धान्या अभावी उपासमार होत आहे. कोरोना संकटामुळे एसटी बससेवा व सर्व वाहतूक बंद असल्यामुळे येथील नागरिकांना अन्नधान्य खरेदीसाठीही बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर एका अर्थाने नैसर्गिक विलगीकरणच झाले आहे. मिरवेल, पारगड ते हेरे बाजारपेठ अंतर सुमारे २५ किमी आहे. इतके अंतर चालत येऊन धान्य नेणे येथील बहुतांशी वृद्ध लोकांना अशक्य आहे. याची दखल घेऊन चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी विशेष लक्ष घालून शासनामार्फत दिले जाणारे धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू या परिसरातील ज्या त्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment