चंदगड तालुक्यात अनेक गावच्या सीमा ग्रामस्थांनी केल्या बंद, गावे होतायेत सेल्फ कॉरंटाईन - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2020

चंदगड तालुक्यात अनेक गावच्या सीमा ग्रामस्थांनी केल्या बंद, गावे होतायेत सेल्फ कॉरंटाईन

बेळगाव-वेगुर्ला मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर भराव टाकून वाहतुक बंद केली आहे.
चंदगड / प्रतिनिधी
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरापासून हे पेव खेड्यांपर्यत पसरण्याची भिती लोकांच्या मनात आहे. कोरोना बाधितांचा आकडा राज्यात दिवसेनदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारने जमावबंदी आणि आता संचार बंदी राज्यामध्ये लागु केली आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच काम हे सर्वतोपरी सुरु आहे. अनेक ठिकाणी नागरीक रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चंदगड तालुक्यातील काही गावांच्यामध्ये गावच्या सीमा बंद करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला गावात येता येत नाही व गावातून बाहेरही जाता येत नाही.
तिलारी घाट संपल्यानंतर भराव टाकून त्या ठिकाणी तालुक्याची सीमा बंद केली आहे.
राज्यातील मुंबई, पुण्यासह विदेशातही चंदगड तालुक्यातील लोक कामानिमित्त वास्तव्याला होते. मात्र कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक चाकरमानी गावाकडे परतु लागले आहेत. पुण्या मुंबई व विदेशातून आलेल्या प्रत्येकाची दवाखान्यात तपासणी करुन त्यांना चौदा दिवस घरीच राहण्याचे सल्ले दिले आहेत. तरीही काही लोक घराबाहेर पडत असल्याने इतरांनाही त्याचा धोका आहे. या विषाणुच्या भीषणतेविषयी लोकांच्या मनात प्रचंड दशहत निर्माण झाली आहे. शहरात राहणारी गावातली तरुण मुलं हि कोरोनाच्या भीती पोटी पालकांच्या सतत बोलवण्या वरून आपापल्या घरी परतली आहेत. त्यांच्या सर्व तपासण्या करूनच त्यांना गावात घेण्यात आला आहे. चुकूनही कोरोनाचा एकही संशयित किंवा रुग्ण गावात येऊ नये म्हणून गाव पातळी वरचे सर्व प्रतिनिधी, तरुण वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने खबरदारी घेताना दिसत आहे. याच अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये गावातील नागरिकांना कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव, संसर्ग होऊ नये, यासाठी त्या त्या गावातील प्रतिनिधी मंडळी आणि तरुणांनी अनोखी शक्कल लढविली आहे. सर्व गावातील येणारे जाणारे रस्ते हे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गावातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही याची खबरदारी हि घेतलेली आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक गाव सेल्फ कॉरंटाईन घेत असल्याचे चित्र हे आज दिसत आहे. यासाठीच आज चंदगड तालुक्यातील अनेक गावांच्यामध्ये ग्रामस्थांनी स्वयुस्फुर्तीने गावच्या सीमा बंद केल्या आहेत. काही ठिकाणी गावच्या सीमेवर लाकडी ओंडके, मातीचा भराव, दगडे टाकून तर काही ठिकाणी चक्क चर खुदाई करुन सीमा बंद केल्या आहेत.
                  
                   अत्यावश्यक सेवेची होणार कोंडी..........
एकमेकांशी येणारा संपर्क व गर्दी टाळण्यासाठी हा उपाय ग्रामस्थांनी केला आहे. मात्र याचा तोटाही होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना सोडून द्या, कोणा अन्य कारणामुळे गावातील एखाद्या व्यक्तीची तब्बेत रात्री-अपरात्री बिघडली. तर अशा वेळी ज्या गावच्या सीमेवर लाकडी ओंडके, मातीचा भराव, दगडे टाकून सीमा बंद केली आहे. त्या ठिकाणी अशा रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेणे शक्य आहे का? याचीही जाणीव ठेवण्याची गरज आहे.

                चार दिवस एसटी सेवा बंद, अठरा लाखांचे नुकसान
कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी सरकारी आदेशानुसार लालपरीही गेले चार दिवस बंद अवस्थेत आहे. रोज 365 फेऱ्या रद्द झाल्याने 15700 किलोमीटर रद्द करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसात एसटीचे अठरा लाखांचे नुकसान झाल्याचे चंदगडचे आगारप्रमुख श्री. हवालदार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment