कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कार्यात भागात शेती मोटर पंप मिटर बिलांचे रिडींग न घेता आकारलेल्या भरमसाठ बिलांबाबत पंप धारक शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. कोवाड येथील वीज वितरण कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मोटर पंप धारक शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टी व महापुरात काही शेतकऱ्यांच्या मोटारी व सर्व शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या मिटरपेट्या महापुरात बुडून मीटर निकामी झाल्या होत्या. त्यामुळे सहा महिने मोटारी बंदच होत्या, महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वीज बिले माफ होणे गरजेचे होते. तशा शासकीय घोषणा देखील झाल्या होत्या. तथापि या घोषणा हवेतच विरल्या. नंतर अर्ज विनंत्या, आंदोलने करूनही बिले माफ झालीच नाहीत. यंदा जून ते डिसेंबर २०२० व नंतर नवीन मोटारी बसवण्या पर्यंत वापर बंद होता. मात्र वापर बंद असलेल्या कालावधीपासून आज अखेर ची सरासरी ४००-५०० रुपये असणारी बीले रिडींग न घेता ५ ते ६ हजार अशी भरमसाठ आली आहेत. वीज कंपनीच्या या अजब व मनमानी कारभारामुळे पंप धारक चक्रावून गेले आहेत.
महापूर व वापर बंद काळातील बिले माफ करून नवीन बिले रिडींग प्रमाणे न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील व सामाजिक कार्यकर्ते संजय कुट्रे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला आहे.
No comments:
Post a Comment