देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा - जलसंपदामंत्री जयंत पाटील, नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2022

देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा - जलसंपदामंत्री जयंत पाटील, नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न

 

राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील , व्यासपिठावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

जेथे महागाई विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तेथे भोंगे कोठे लावायचे आणि कोठले काढायचे याचीच जास्त चर्चा होत आहे. या सर्वाना मूठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून  कोल्हापूरच्या दोन खासदारासहीत    १००   हून अधिक आमदार निवडून देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यानी केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

 नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी पक्षप्रमुख खा. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर चालू आसलेला कार्यकर्त्यांचा संकल्प मेळाव्याचे आयोजन चंदगड आजरा गडहिंग्लज मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी आयोजन केले होते . यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संवाद मेळावा पार पडला. यावेळी मंत्री जयंत पाटील बोलत होते.

  यावेळी चंदगड, आजरा श, गडहिंग्लज या तालुक्यातील सर्व कार्यकारणीचे सदस्य यांच्याशी जयंत पाटील यांनी थेट संवाद साधत पक्षाच्या बांधणीबाबत चर्चा करून  पक्ष वाढीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी सर्व तालुकाप्रमख , शाखाप्रमुख , विधानसभा मतदारसंघ प्रमुख व  राष्ट्रवादी पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते यांच्याशी  चर्चा केली . यावेळी गडहिंग्लज , आजरा , चंदगडच्या माजी आमदार सध्यादेवी कुपेकर , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए . वाय . पाटील , राष्ट्रवादी महिला सर्व तालुकाध्यक्ष , युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष , विद्यार्थी सेल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष , विविध संस्थावर कार्यरत असणारे पदाधिकारी , तालुक्यातील विविध कार्यकरणीचे पदाधिकारी  हजारोच्या संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते . या कार्यक्रमाचे संपूर्ण निटनेटके आयोजन हे चंदगडचे आ . राजेश पाटील यांनी केले होते .

यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले ,बाबासाहेब कुपेकरानी विकास कामांचा पाया रचला तर आमदार राजेश पाटील यानी कळस चढवला . कोणीही लुंग्या -सुंग्या जे आरोप करत आहेत त्याना चोख प्रत्युत्तर दया . या विभागातील प्रकल्पग्रस्थांचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी आणि राजेश पाटील स्वस्थ बसणार नाही .

आमदार राजेश पाटील म्हणाले , चंदगडमध्ये हरितक्रांती झाली आहे ती केवळ राष्ट्रवादीमुळेच . मतदारसंघात ३०० कोटीची कामे झाली आहेत .मी बरे बोलणारा कार्यकर्ता नसून खरे बोलणारा कार्यकर्ता आहे .कोरोणा , महापूर यामूळे पक्षबांधणी मजबूत करताना अडचणी आल्या असल्या तरी आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोहचवणार असल्याचे सांगून राष्ट्रवादीच विकासाचे स्वप्न पुरे करत असल्याने कार्यकर्त्यानी साथ देण्याचे आवाहन केले .

यावेळी रवि वर्फे , सुनिल गवाणे ,सक्षणा सलगर , सुनिल गवाणे , ए.वाय. पाटील , मा .आमदार संध्यादेवी कूपेकर यानी मनोगते व्यक्त केली .

स्वागत अमरसिंह चव्हाण यानी सूत्रसंचालन एम .के. पाटील यानी तर आभार महाबळेश्वर चौगुले यांनी मानले.




No comments:

Post a Comment