छत्रपती संभाजीराजे यांचे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र, काय आहे या पत्रामध्ये...... - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2022

छत्रपती संभाजीराजे यांचे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र, काय आहे या पत्रामध्ये......

                      

छत्रपती संभाजीराजे (संग्रहित छायाचित्र)

छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र

          छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेची निवडणूक निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत.त्यासाठी छत्रपतीच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा छत्रपती शाहु महाराज यांच्या विचाराना मानणा-या सर्वपक्षीय आमदारांनी पाठींबा द्यावा,यासाठी छत्रपती संभाजी राजे यानी खुले पत्र प्रसिध्दीला दिले आहे.राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या  हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.त्यामुळे शिव शांहूच्या विचारांना मानणा-या विधानसभा सदस्यांनी छत्रपती संभाजीराजे याना बिनशर्त पाठींबा द्यावा.

प्रति,
सर्व विधानसभा सदस्य,
महाराष्ट्र विधीमंडळ

आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. 

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे. 

२००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या  हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले. 

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. 

माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो.

आपला,
संभाजी छत्रपती
-----------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment