किटवाड धरण ओव्हरफ्लो, धबधबा सुरू, पर्यटकांची वर्दळ - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2022

किटवाड धरण ओव्हरफ्लो, धबधबा सुरू, पर्यटकांची वर्दळ

किटवाड नजिकचा कालकुंद्री हद्दीतील धबधबा 

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) हद्दीतील किटवाड नजीकचा लघु पाटबंधारे  प्रकल्प क्रमांक १ काल ओव्हरफ्लो झाला. या धरणामुळे निर्माण झालेला धबधबा प्रवाहीत झाल्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. 

       धरण काल शनिवार दि. १७ जुलै रोजी सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. गतवर्षी हेच धरण तब्बल एक महिना आधी म्हणजे १९ जून रोजी ओव्हरफ्लो झाले होते. ताम्रपर्णी नदीच्या पुराचा धोका कमी करण्यासाठी किटवाडच्या दोन्ही धरणातील बहुतांश पाणी मे व जून महिन्यात सोडले होते. परिणामी धरण ऑगस्ट महिन्यात भरेल असा अंदाज होता. तथापि गेल्या चार दिवसांतील जोरदार पावसामुळे धरण लवकर भरले आहे. यामुळे कोवाड वरील महापुराचा धोका वाढू शकतो. धरणाच्या सांडव्यातील पाण्यामुळे तयार झालेला धबधबा पाहण्यासाठी  पहिल्याच दिवशी परिसरातील उत्साही पर्यटकांनी गर्दी केली आहे.

         पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेना शासन काळात कृष्णा खोरे विकास योजनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व चंदगडचे आमदार तथा कृष्णा खोरे  महामंडळाचे सदस्य भरमूअण्णा पाटील यांच्या प्रयत्नातून हे धरण साकारले होते. तेव्हापासून परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. पण इथले निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. 

          गेल्या तीन-चार वर्षात बेळगाव परिसरातील पर्यटक आंबोली ऐवजी जवळचे ठिकाण म्हणून किटवाड ला पसंती देऊ लागल्याने येथील तरुणांसाठी व्यवसायाची उपलब्धता होत आहे. तथापि अतिउत्साही पर्यटक काचेच्या दारू बाटल्या, पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या व इतर वस्तू कालकुंद्री हद्दीतील नजीकच्या शिवारात फेकून देतात. हुल्लडबाजी नित्याची झाली आहे. याचा मोठा त्रास शेतकरी बांधवांना होत आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन व हुल्लडबाजी रोखणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

No comments:

Post a Comment