दौलत-अथर्वच्या कामगारांचे दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरु, सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, गोपाळराव पाटील यांच्यासह कारखान्याच्या संचालकांची आंदोलनस्थळी भेट - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2022

दौलत-अथर्वच्या कामगारांचे दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरु, सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, गोपाळराव पाटील यांच्यासह कारखान्याच्या संचालकांची आंदोलनस्थळी भेट

आंदोलनस्थळी घोषणा देताना कामगार.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) अथर्व इंटरट्रेड संचलित दौलत शेतकरी साखर कारखान्यातील कामगार आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसासाठी दुसर्‍या दिवसीही बेमुदत संपावर गेले. दरम्यान सोमवारी आपल्या न्याय हक्कासाठी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा निर्णय आज आंदोलन स्थळी कामगारांनी घेतला.कारखान्याच्या गेटवर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात दौलत साखर कारखान्यातील शंभर टक्के कामगार उपस्थित होते.

दौलत कामगारांना आंदोलनस्थळी मार्गदर्शन करताना गोपाळराव पाटील.

           दरम्यान  दौलतच्या कामगारांच्या  सुरु झालेल्या बेमुदत संपास आज विविध संस्था, व्यक्तींनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यामध्ये दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील व अन्य सर्व संचालक यांनी कामगारांच्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळी गोपाळराव पाटील व अशोक जाधव यांनी अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. कंपनीबरोबर लीज करार करताना कामगार, शेतकरी यांची देणी देण्याबाबत केलेल्या तरतुदीबाबतची माहिती दिली. त्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कामगारांच्या सर्व न्याय मागण्यासाठी १९ ऑगस्टपासून एकजुटीने संप सुरु केला आहे. त्यासाठी चंदगड तालुका साखर कामगार युनियन (सिटू) आणि सर्व कामगारांचे अभिनंदन केले. कामगारांच्या सर्व मागण्याबाबत युनियनशी चर्चा करावी असे पत्र अथर्व इंटरट्रेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना देऊन उद्या दुपारी चर्चा करण्यासाठी वेळ घ्यावा असे गोपाळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

       यावेळी कॉम्रेड आबासाहेब चौगले, अशोक गावडे, अशोक चांदेकर, नारायण तेजम, रामलिंग पाटील, अनिल होडगे, पुंडलीक गावडे, गुंडू गावडे, निवृती पाटील, झिलु गावडे, महंतेश कणगली, गणेश फाटक आदीनी आपली मनोगत व्यक्त केली. जनरल सेकेटरी प्रदिप पवार, काँ. प्रा. सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. 

काय आहेत कामगारांच्या मागण्या ...

              कामगारांच्या पगारातून सुरू असलेली कपात बंद करून एप्रिल २०२२ पासून केलेली कपात रक्कम परत करावी, २०१९ च्या त्रिपक्षीय करारानुसार कामगारांना १२ टक्के वेतन वाढ लागू करून त्याचा २०१९ पासूनचा फरक मिळावा, नियमानुसार महागाई भत्ता, वार्षिक वेतन वाढ, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम, रजा, अपघात संरक्षण व नुकसान भरपाई द्यावी, कामगारांच्या अन्यायी बदल्या रद्द कराव्यात, कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी या आहेत.

No comments:

Post a Comment