चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शासनाच्या २० पटाखालील शाळा बंद करण्याच्या धोरणाला विविध शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक,पालक व जाणकार नागरिकांतून विरोध करण्यात आला. रवळनाथ मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन ७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरले. बळीराजा शेतकरी संघटनेने या बैठकीचे नियोजन केले होते.
बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, 'शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क दिला आहे, मात्र, वाडीवस्तीवरील शाळा बंद करून शासन तो हिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. याला आमचा विरोध आहे. सुरेश हरेर, शंकर मनवाडकर, अशोक आर्दाळकर, प्रकाश पाटील, धनाजी पाटील, गोविंद पाटील, सुभाष चौगुले, सचिन बल्लाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. शाळा बंद होण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा झाली. या धोरणाला शेवटपर्यंत विरोध करण्याचे ठरले. त्यासाठी ७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला.यावेळी विक्रम मुतकेकर, सुनील नाडगौडा, सतीश भोसले, युवराज पाटील, नामदेव पाटील, रामचंद्र गुरव आदी उपस्थित होते. प्रवीण साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. परसू गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment