तिलारी घाटात बेकायदा ये जा करणाऱ्या अशा अवजड वाहनांमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. (छाया - तुळशीदास नाईक) |
दोडामार्ग दि. २१ / सी. एल. वृत्तसेवा
गोवा, दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून अवजड वाहनांना बंदी असताना गेल्या काही महिन्यांपासून तिलारी घाटातून दहा ते बारा सोळा चाकी वाहने बेकायदा घाटातून ये जा करत आहेत. त्यामुळे ही वाहने अडकून अनेक तास वाहतूक बंद होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. शनिवारी सहा तासात या घाटात वळणावर दोन अवजड वाहने अडवून पडल्याने दोन वेळा घाटातील वाहतूक ठप्प होऊन प्रवाशी नागरीक यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
कुणाच्या आशीर्वादाने ही वाहने सोडली जातात. चंदगड-दोडामार्ग पोलिस व चंदगड बांधकाम विभाग या वाहनांवर कारवाई का? करत नाहीत. अवजड वाहनांना प्रतिबंध असे फलक किंवा अवजड वाहने येऊ नये यासाठी घाटाच्या माथ्यावर पायथ्याशी कमानी का? बांधल्या जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तिलारी घाट मार्गे दोडामार्ग मार्गे गोवा अंतर कमी आहे. त्यामुळे बेळगाव येथील अनेक दहा बारा सोळा चाकी वाहने तिलारी घाटाचा वापर करत आहेत. या अवजड वाहनांमुळे तिलारी घाटातील अनेक धोकादायक वळणावर असलेले संरक्षण कठडे तोडून टाकले आहेत. त्यामुळे अपघात वाढत आहेत. पण बांधकाम विभाग अधिकारी चंदगड याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या घाटातून येणारे खाजगी वाहन धारक तसेच एस. टी. बस मधून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत.गेल्या पंधरा ते वीस दिवसांत दोन वेळा घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. काही वाहने आंबोली मार्गे वळवली होती. लोखंड भरलेले दोन अवजड वाहतूक करणारे ट्रक घाटात अडकले होते. यावेळी घटनास्थळी आलेल्या चंदगड पोलिसांचे लक्ष वेधले होते. अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पण अद्याप अशा वाहनांवर कारवाई होत नाही. विजघर पोलिस चेकपोस्ट येथून ही अवजड वाहने कुणाच्या आशीर्वादाने ये जा करतात. घाटात धोकादायक परिस्थिती असताना ही वाहने जातात कशी याचीच चर्चा सुरू झाली आहे.
अशा अवजड वाहनांमुळे तिलारी घाटात सतत वाहतूक ठप्प होत आहे त्यामुळे कोल्हापूर बेळगाव पुणे गोवा येथे जाणारे एस. टी. बस मधिल प्रवाशी अडकून पडतात त्यांची गैरसोय होते गाड्या उशिरा धावतात. सार्वजनिक बांधकाम अधिकारी चंदगड यांचे या घाटात दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक वाहन धारक हैराण झाले आहेत. शनिवारी पहाटे तसेच दुपारी दोन वेळा वळणावर ही अवजड वाहने अडकून पडली. त्यामुळे पुन्हा दोन वेळा तिलारी घाटात वाहने अडकून पडली. त्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना प्रवाशी नागरीक वाहन धारकांना सोसावा लागला.
तिलारी घाटात वाढती बेकायदा अवजड वाहने वाहतूक अशी सुरू राहिली तर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभाग यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून तिलारी घाटाचा रस्ता सुस्थितीत केला. पण आता अवजड वाहने कठडे तोडून टाकत आहेत. घाट धोकादायक बनत चालला आहे.
तिलारी घाटातून होणारी अवजड वाहने वाहतूक तातडीने बंद करावी यासाठी चंदगड पोलिसांनी बांधकाम विभाग यांनी संयुक्त मोहीम सुरू करावी. घाटातून अवजड वाहतूक होऊ नये. यासाठी आवश्यक सूचना फलक घाटमाथ्यावर पायथ्याशी लावावे. तसेच या ठिकाणी एस. टी. बस पास होईल. एवढ्या उंचीची कमानी बांधावी. जेणेकरून मोठी अवजड वाहने येणार नाहीत. तेव्हा तातडीने तिलारी घाटातील अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी तसेच चंदगड दोडामार्ग पोलिसांनी प्रामाणिकपणे लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment