आजरा जनता सहकारी गृहतारण संस्था आता चंदगडकरांच्या सेवेत, पाटणे फाटा येथे शाखेचे रविवारी होणार उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2023

आजरा जनता सहकारी गृहतारण संस्था आता चंदगडकरांच्या सेवेत, पाटणे फाटा येथे शाखेचे रविवारी होणार उद्घाटन

कागणी / चंदगड : सी. एल.  वृत्तसेवा 

          आजरा येथील जनता सहकारी  गृहतारण संस्था आता चंदगडकरांच्या सेवेत येणार असून रविवार दि. ८ जानेवारी रोजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे शाखेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी रोजगार हमी योजना मंत्री  भरमूअण्णा पाटील व अण्णाभाऊ संस्था समूह, आजराचे प्रमुख अशोकअण्णा चराटी उपस्थित राहणार आहेत. 

राजेश पाटील        भरमूअण्णापाटील     अशोकअण्णा चराटी       मारूती मोरे
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारुती गोरे असतील. कार्यक्रमास चंदगडकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर व मॅनेजर मधुकर  खवरे यांनी केले आहे. 

      कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी दुर्गम भागातील आजरा तालुक्यात सहकाराचे मोठे जाळे पसरलेले आहे. जनता सहकारी गृहतरण संस्था ही त्यापैकीच एक ! काही वर्षापूर्वी आजरा येथील प्राध्यापक, शिक्षक यांना गृह कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेत हेलपाटे मारूनही वेळेवर कर्ज मिळत नव्हते.

          त्यामुळेच येथील आजरा महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी व इतर सहकाऱ्यांनी मिळून नोकरदार वर्गाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2001 रोजी या संस्थेची स्थापना केली. अवघे 101 सभासद 11 हजार भाग भांडवल आणि 2008 पर्यंत फक्त आजरा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने गेल्या 20 वर्षात दैदीप्यमान कामगिरी करून केवळ आजरा तालुकाच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे.

           महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळवणारी कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. या संस्थेचा आजरा मुख्य कार्यालया बरोबर गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी आणि सांगली असा शाखा विस्तार आहे. गडहिंग्लज आणि कोल्हापूर शाखेचे कामकाज स्वमालकीच्या इमारतीमध्ये सुरू आहे. लवकरच कराड आणि सातारा येथे संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. संस्थेचे वाढते कार्यक्षेत्र आणि सभासदांच्या मागणीनुसार आरटीजीएस, एनईएफटी, क्यू आर कोड स्कॅन, एसएमएस सुविधेसह वीज बिल भरणा करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

          शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना घरखरेदी, घरबांधणी किंवा फ्लॅट खरेदीसाठी एक कोटी रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो, तर प्लॉट खरेदी करण्यासाठी 75 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. गृहकर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यांना ( व्याज व मुद्दल ) आयकर सवलत दिली जाते. शिवाय कर्जाचा हप्ता कर्जदारांच्या पगारातून कपात होत असल्याने कर्जाची वसुली शंभर टक्के होते. त्याचमुळे ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. संस्थेकडे सध्या 70 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.   ठेव तारण कर्ज योजना, सोनेतारण कर्ज योजना आदि कर्ज योजना या बरोबर कॉलडिपॉझिट, मुदत बंद, दाम दुप्पट,  रिकरींग, बचत ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना अशा विविध आकर्षक व्याजदराच्या  ठेव योजना सुरू आहेत. 

         माळीण दुर्घटना, केरळ पूर घटना, कोविड महामारी, कोल्हापुरातील पूर अशा अनेक आपत्तीच्या वेळी संस्थेने आपत्तीग्रस्तांना भरभरून आर्थिक मदत केली आहे. शिवाय समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत दुर्घटनाग्रस्त, कुटुंबाला आर्थिक मदत असे अनेक सामाजिक उपक्रम संस्था राबवीत आहे. पारदर्शक व स्वच्छ कारभार, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण, काटेकोर नियोजन, दूरदृष्टी यामुळे संस्थेला सतत ऑडिट अ वर्ग प्राप्त झालेला आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व कर्मचारी यांच्या आपुलकीच्या व घरपोच सेवेमुळे सभासदांचा संस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे संस्थेला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर व मॅनेजर मधुकर खवरे यांनी दिली.



No comments:

Post a Comment