चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
विल्यम शेक्सपियर यांचे कार्य संपूर्ण जगात अजरामर आहे. त्यांचे विचार त्यांच्या साहित्यातून अवतरले आहेत. साक्षरता आणि शहाणपण यांचा संबंध असतोच असं नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते म्हणून तो माणूस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख व दुख येतात त्यामध्ये जगायचं कसं हे आपण शिकले पाहिजे. विल्यम शेक्सपियर यांनी आपल्या साहित्यातून मानवी जीवन रेखाटले आहे. त्यामुळेच ते जगप्रसिद्ध नाटककार आहेत. समाज हा साहित्यातून शिकत असतो. समाज व साहित्य याचा एकमेकांवर परिणाम होतो.' असे मत कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख व शिवाजी विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. ए. एस. अरबोळे यांनी हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत आयोजित 'विल्यम शेक्सपियर जीवन आणि कार्य' या विषयावर आयोजित व्याख्यानात व्यक्त केले. जागतिक इंग्रजी दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते.
प्रारंभी विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचा हेतू व विल्यम शेक्सपियर यांचा यांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकातून प्रा. डॉ. आय. आर. जरळी यांनी घेतला. प्रा. पी. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतात विल्यम सेकसपियर यांच्या साहित्याचे महत्व सांगितले.
प्राचार्य डॉ. अजळकर यांच्या हस्ते डॉ. ए. एस. अरबोळे यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रा. पी. ए. पाटील, डॉ. आय. आर. जरळी व प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे, प्रा. यु. एस. पाटील, डॉ. चंद्रकांत पोतदार व आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. एस. ए. पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर आभार प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी मानले.
No comments:
Post a Comment