चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"कविता हा उत्कट भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार असतो. उत्तम शब्दांची निवड करण्यासाठी कवी जवळ शब्द वैभव असावे लागते. कवीने एखादा अनुभव इतक्या उत्कटतेने घेतलेला असतो की त्याला जणू सविकल्प समाधीचा अनुभव येत असतो. कविता निर्माण करण्यासाठी व्यासंगाची आणि सूक्ष्म निरीक्षणाची गरज असते. उत्तम कविता अल्ताक्षर रमणीय असते. ती मोजक्या शब्दात फार मोठा आशय व्यक्त करू शकते."असे प्रतिपादन प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. महाविद्यालयाची विद्यार्थिनी चैत्राली सुतार हिने लिहिलेल्या' चैत्रपालवी' या काव्यसंग्रहात सुमारे ५० कविता आहेत.
याप्रसंगी सटुपा फडके यांनी चैत्रालीकडे उपजतच काव्य गुण असल्याचे सांगून तिला अभिव्यक्तीसाठी सतत प्रोत्साहन दिले असे सांगितले. तिचा संग्रह प्रकाशित झाल्याचा सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया देऊन यापुढेही तिने दर्जेदार साहित्य निर्मिती करावी असे आवाहन केले. याप्रसंगी चैत्रालीच्या काव्यसंग्रहासाठी आर्थिक पाठिंबा देणारे युवा व्यावसायिक पंकज पाटील, संतोष नेवगे, तुकाराम पाटील, प्रकाश वाईंगडे, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रभाकर सुतार, मारुती नाईक, महादेव सुतार, राखी सुतार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी चैत्राली सुतारने आपले मनोगत व्यक्त करताना आपला आजवरचा प्रवास व आलेल अनुभव यांचे कथन केले. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले तर विजय कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment