चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार जाहिर झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कार्याची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2023

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार जाहिर झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कार्याची माहीती


       चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानित्त समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तीचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत आहे. यातील काही निवड पुरस्कार जाहिर झालेले मान्यवर. त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घ्या......

----------------------------------------------------------------------------------

लाकुरवाडी येथे खडकाळ माळरानावरील सहा गुंठे जमिनीत मिरचीचे पावणेदोन लाखाचे उत्पन्न - तानाजी बाळू दळवी (प्रगतशील शेतकरी)

कार्य -

       चंदगड तालुक्यातील भात आणि ऊस या दोन पिकात गुरफटून पडलेल्या शेतकऱ्यांना खडकाळ माळरानावरील सहा गुंठे जमिनीत मिरचीचे पावणेदोन लाखाचे उत्पन्न घेऊन लाकूरवाडी येथील तानाजी बाळू दळवी यांनी जागे केले. बीए, बीपीएड पदवीधारक असलेल्या दळवी यांनी पदवीची पुंगळी घेऊन नोकरीसाठी वणवण भटकंती केली. चार ठिकाणी नोकरीही केली. पण तुटपुंज्या पगारात स्वतःचा उदरनिर्वाह चालत नाही, तिथे कुटुंबाचा कसा चालवणार? याची भ्रांत त्यांना पडल्यामुळे ते वडिलोपार्जित शेतीकडे वळले आणि चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील एक तज्ञ मिळाला. शेतीत भाजीपाला पिकाचे विक्रमी उत्पन्न घेणारा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचा बोलबाला झाला. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेटी देऊ लागले. तालुका कृषी विभागाने त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. नगन्य पगाराच्या नोकरीसाठी स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या तरुणांसमोर हे उत्तम उदाहरण आहे. 

----------------------------------------------------------------------------------

हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आदर्श शिक्षक - आर. डी. पाटील 

(अध्यापक - रामलिंग हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज तुडिये)

कार्य -

         रामलिंग हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज  तुडिये येथे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले आर. डी. पाटील यांचे शिक्षण BA. BEd असून ते गणित, बुद्धिमत्ता व एमसीसीचे शिक्षक आहेत. त्यांची एकूण सेवा आतापर्यंत ३५ वर्षे पूर्ण झाली आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा, NNMS, नवोदय परिक्षा यासाठी सतत १३ वर्षे मार्गदर्शन करून १०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. राज्य गुणवत्ता यादीतही त्यांचे विद्यार्थी प्रथम आले आहेत. उत्कृष्ट एमसीसी संचलन मार्गदर्शक आहेत. या स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. संगीत क्षेत्रातही त्यांचे भरीव कार्य असून उत्कृष्ट शास्त्रीय हार्मोनियम वादक व ढोलकी पटू म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत भजन स्पर्धेत १०० हून अधिक बक्षिसे पटकावली, नाटिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय व संगीत नाट्य परीक्षक तसेच शिक्षक म्हणून तालूका ते राज्य स्तरीय साधन व्यक्ती म्हणूनही ते परिचित आहेत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------

वनसंपदेच्या संवर्धनासाठी केलेले कार्य आदर्शवत - सागर सर्जेराव पोवार, वनरक्षक (वन परिक्षेत्र कार्यालय चंदगड)

कार्य - 

       गेल्या चारपाच वर्षांत चंदगड तालुक्यामधील सेवेत वनरक्षक सागर पवार यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. येथील वनसंपदेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य आदर्शवत ठरले आहे. आपले कर्तव्य पार पाडत असताना अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, वनक्षेत्रातील अतिक्रमणे, वन्य प्राण्यांची शिकार याला आळा घालनेकामी ३ शिकारीच्या केसेस दाखल करुन संशयितांना मुद्देमालासह पकडून त्यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यांचे कार्य इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा व दिशादर्शक आहे.  

     वन्यप्राण्यांच्याकडून शेतपिकाचे व मालमत्तेचे होणारे नुकसानीची तात्काळ पाहणी करुन संबंधित शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी स्वत: पिक नुकसानीची प्रकरणे वरिष्ठ कार्यालयाकडे घेवून जावून तात्काळ मंजूर करुन दिली. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर चांगले नियोजन करुन कोणतीही जीवितहानी न होता वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवातास पाठविण्याचे कामगिरी बजावली. अडकूर येथे भरवस्तीत टस्कर हत्ती आल्याची माहिती मिळताच इतर शासकीय यंत्रणेशी संपर्क करुन वनविभाग व इतर यंत्रणेच्या मदतीने घटप्रभा नदीतील पाण्याच्या मार्गे आजरा येथील जंगलामध्ये पाठवले. गावात आलेल्या जखमी प्राण्यांना पकडून त्यांच्यावर उपचार करुन पुन्हा त्यांना जंगलात सोडले. शेतकऱ्यांना नुकसानीची प्रकरणे आॅनलाईन करताना अडचणी येत असल्याने स्वत: हि प्रकरणे तयार करुन त्यांना आॅनलाईन करुन देवून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच वनक्षेत्रात केलेली कामे उत्कृष्ट दर्जाची आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------

जनसेवेचा वसा घेतलेले शेलारमामा - रघुवीर खंडोजी शेलार (रा. पारगड, ता. चंदगड, वय ७७ वर्षे)

कार्य -
         जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आयुष्यात जनतेचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून पारगड पंचक्रोशीतील लोकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार गेली २५-३० वर्षे निःपक्षपाती व निस्वार्थीपणे करत आहेत. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड पंचक्रोशीच्या कडेकपारीसह  राजकीय, शासकीय व प्रशासकीय विभागात आदराने त्यांचे नाव घेतले जाते. किल्ले पारगड ते मोरले रस्त्यासाठी त्यांनी सन २००५ मध्ये पहिले उपोषण पारगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केले. जनसेवेचा वसा त्यांनी आपले गुरुजी प्रदीप सिताराम नाईक यांच्याकडून घेतल्याचे ते सांगतात. आजपर्यंत त्यांनी चंदगड, दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २९ उपोषणे केली असून त्यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.
       सन १६७६ पासून छत्रपती शिवरायांच्या आदेश प्रमाण मानून गडावरील लोक कोणत्याही सोयी सुविधांशिवाय गेली साडेतीनशे वर्षे हालआपेष्टांचे जीवन कंठत गडावर राहत आहेत. गेल्या काही वर्षात हा किल्ला वन विभागाच्या ताब्यात दिल्यामुळे वन खात्याकडून गडावरील रहिवाशांची गळचेपी सुरू आहे. याला वाचा फोडण्याचे काम शेलारमामा करत असून वन खात्याच्या जोखडातून किल्ला मुक्त करावा यासाठी आपले आंदोलन व संघर्ष गडकरी मावळ्यांच्या सोबतीने अखेरपर्यंत सुरू ठेवून लढा यशस्वी करण्याचे त्यांचे ध्येय आहे. 
        तिन्ही तालुक्यातील आजपर्यंतचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच यापुढेही त्यांनी पारगड पंचक्रोशीतील नागरिकांच्या उत्कर्षासाठी सहकार्य करावे, अशी इच्छा शेलारमामांनी व्यक्त केली आहे.
-----------------------------------------------------------------------------------
आदर्श अंगणवाडी सेविका - सौ. जयश्री संजय पाटील


 कार्य - 
          सौ. जयश्री संजय पाटील या ज्ञानदीप अंगणवाडी, क्रमांक २४८, नागरदळे (ता. चंदगड) येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे माहेर हुंदळेवाडी व गाव नागरदळे आहे. BA BEd अशा उच्चशिक्षित असलेल्या जयश्री १५ फेब्रुवारी २०११ रोजी अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या असून आत्तापर्यंत त्यांची १२ वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण झाली आहे. अंगणवाडीत दाखल बालकांचे पोषण व शिक्षण यांच्याकडे ममतेच्या भावनेने लक्ष पुरवून त्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास करण्याबरोबरच शासनाकडून आलेली विविध प्रकारची सर्वेक्षणे आदी कामात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. कोविड-१९ च्या काळात हॉटस्पॉट सर्वेक्षण करणे, बाहेरून आलेल्या व्यक्तींना आरोग्य सुविधा पुरवणे, विलगीकरण करणे, पॉझिटिव्ह रुग्णांना वैद्यकीय व मानसिक आधार देण्याचे कार्य त्यांनी बजावले आहे. आपली अंगणवाडी व त्यात येणारी बालके तालुक्यात आदर्श ठराविक यासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. 
----------------------------------------------------------------------------------
आदर्श शिक्षक व  गुणवंत कर्मचारी पुरस्कार विजेते - रियाज अब्दुल शेख 


कार्य -
         रियाज अब्दुल शेख यांचे मुळगाव तुर्केवाडी (ता. चंदगड) हे असून सध्या ते विद्यामंदिर माडवळे ता. चंदगड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. BA.DEd. शिक्षण असलेले शेख यांची शिक्षक म्हणून एकूण सेवा २६ वर्षे झाली आहे. या काळात त्यांनी उदात्त हेतूने विद्यार्थी घडवण्याबरोबरच केलेल्या वृक्षारोपण, वनराई बंधारा, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राम स्वच्छता अभियान, शिष्यवृत्ती परीक्षा आदी सामाजिक कार्याची दखल घेऊन दक्षिण महाराष्ट्र मँचेस्टर इचलकरंजी, केदारी रेडेकर फाउंडेशन गडहिंग्लज, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तसेच सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 
----------------------------------------------------------------------------------
 आदर्श  आशा स्वयंसेविका - सौ. अंजना सागर पाटील 
   (रा. कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर)

कार्य -
        सौ. अंजना सागर पाटील यांच्या 2009 पासून आशा स्वयंसेविका म्हणून गावात कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्यांनी काम केले. केवळ डिलिव्हरी पेशंट आले तरच मानधन मिळायचं. कामाची व्याप्ती मात्र प्रचंड होती. गेल्या १४ वर्षाच्या सेवेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य समजून केलेल्या कार्याबद्दल त्या समाधानी आहेत. शासन स्तरावरून अनेक सुविधा अलीकडे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आपल्या विभागातील १७० कुटुंबांना नियमित घर भेटी देऊन त्यांच्या आरोग्य विषयी विचारपूस करत या सुविधा पोहोचवण्याचे त्यांचे कार्य निरंतर सुरू आहे. कोरोना महामारीचा काळ हा आशा स्वयंसेविकांच्या कसोटीचा काळ होता. लोकांशी सामाजिक अंतर ठेवून रोज संपर्क करणे. गावातील पॉझिटिव्ह पेशंट, विलगीकरण, बाहेरून आलेल्या व्यक्तींची चौकशी याप्रसंगी वाईट बोल सुद्धा ऐकून घ्यावे लागले. (आत्ताही रुग्णांची चौकशी करताना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते). तरीही त्यांनी लोकांना शासकीय नियमांचे पालन करण्यास भाग पाडले. म्हणूनच अनेक पॉझिटिव्ह पेशंट असूनही गाव हॉटस्पॉट होण्यापासून वाचले. कोरोना काळात त्या घरोघरी फिरून मास्क, सॅनिटायझर, औषध गोळ्यांचे वाटप, ऑक्सिजन, शरीराचे तापमान तपासणी अशा गोष्टी स्वतःच्या जीवावर उदार होऊन केल्या. गावात वेळोवेळी भरणारी आरोग्य शिबिरे, लसीकरण, जनजागृती, लसीकरण कॅम्प यातील त्यांचा सहभाग उत्साहवर्धक असतो. गावात १००% कोरोना लसीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या कामी कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कालकुंद्री, पोलीस पाटील, पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या काळातही उत्तम काम करणारे - चंद्रकांत अरुण बोडरे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती चंदगड)

कार्य - 

        गेल्या तीन वर्षात चंदगड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी म्हणून चंद्रकांत बोडरे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते चंदगड तालुक्यात रुजू झाले. तेव्हा कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत होता. या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका जिल्हा परिषद संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी यांना सोबत घेऊन चंदगड तालुक्यातील कोरोनाचा प्रकोप आरोग्य विभागाच्या सहकार्याने बोडरे यांनी सक्षमपणे पेलले. पंचायत समितीच्या अंतर्गत विविध विभागात अनेक रिक्त पदे आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह तालुक्याचा प्रशासकीय गाडा समर्थपणे चालवण्यात यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र विकास सेवा मधून २००९ मध्ये त्यांची बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे सेवा सुरू झाली. जून २०१५ ते २०१७  कागल येथे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी  पदाचा अतिरिक्त चार्ज सांभाळला. २०१७ ते २०२० गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती धडगाव तर सप्टेंबर २०२० पासून ते चंदगड पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा माणारे - डॉ. बी. डी. सोमजाळ

(तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर) 

कार्य - 

      तालुक्यातील गरीब रुग्णांसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर बी. डी. सोमजाळ यांनी मिरज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी मिळवली. नंदुरबार जिल्ह्यात ५ वर्षे सेवेनंतर अडकूर येथे १७ वर्षे वैद्यकिय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्याचा ठसा उठवला आहे. सध्या तालुका आरोग्य अधिकारी पदभारही सांभाळत आहेत. त्यांच्या रुग्णाभिमुख सेवेमुळे अडकूर हे जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेले आरोग्य केंद्र बनले आहे. चांगल्या टीमवर्कमुळे त्यांच्या आरोग्य केंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले असून सुंदर माझा दवाखाना मोहिमेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानी २२ वर्षांच्या सेवेत १५ हजाराहून अधिक  स्त्री नसबंदी तर १० हजाराहून अधिक पुरुष नसबंदी बिनाटाका शस्त्रक्रिया यशस्वी करून विक्रम केला आहे. त्यामूळेच शासनाने डॉ. सोमजाळ यांना कुटूंब नियोजनाचे मार्गदर्शक म्हणून नियूक्ती केली आहे. तालूका आरोग्य अधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरत आहे. कोरोना काळात अहोरात्र काम करणारे डॉ. सोमजाळ आजही रोज ३०० रुग्णांची सेवा करतात. या कार्यात पत्नी डॉ. नजमिन सोमजाळ यांचे सहकार्य लाभत आहे. 

----------------------------------------------------------------------------------

लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे आदर्श पत्रकार - तातोबा भिकाजी गावडा/पाटील (मुगळी, ता. चंदगड)

कार्य - 

         गेली ६ वर्षे तातोबा गावडा हे अन्वेषण ग्रुप ऑफ मिडीयाचे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य म्हणूनही त्यांचे संघटन कार्यात योगदान आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो सुदृढ राहावा यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून चंदगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक सामाजिक व राजकीय विषय मांडण्याबरोबरच विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले आहे. सामाजिक कार्यात ही ते अग्रेसर आहेत. गेली पाच वर्षे भिमगर्जना मानवाधिकार संघटनेचे चंदगड तालुका अध्यक्ष म्हणून अनेक पीडित कुटुंबांना कायदेशीर सल्ला व न्याय दिला आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांचे सुरू असलेले कार्य असेच पुढे सुरू राहावे.

--------------------------------------------------------------


1 comment:

जोशी गुरुजी said...

बोडरे साहेब आपला आम्हास अभिमान आहे.

Post a Comment