चंदगड तालुक्यातील कालकुंद्रीत लोकनेते स्वर्गीय तुकाराम पवारांची जन्मशताब्दी महोत्सव संपन्न
महाराष्ट्र केसरी विजेते पै. विष्णू जोशीलकर बोलताना. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम सत्तर वर्षांपूर्वी लोकनेते तुकाराम पवार यांनी केले. गोरगरीब घरातील मुले शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. १०० वर्षानंतरही त्यांचे आचार व विचार समाजाला मार्गदर्शक ठरतील. यासाठी मुलांनी आपल्या आई-वडिलांचे संस्कार आयुष्यभर पुरणारे आहेत मुलांनी ते अंगीकृत कारावेत असे प्रतिपादन पै. विष्णू जोशीलकर यांनी केले.
कालकुंद्री येथे स्व.तुकाराम पवार यांच्या १०० व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एम. एम. तुपारे होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एल. बेळगावकर यांनी केले. स्वर्गीय पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पाहुण्यांचा परिचय ई. एल. पाटील यांनी केला.
खेडूत शिक्षण मंडळाने खेडूतांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची गणती करता येणार नाही असे मत अध्यक्षीय भाषणात एम. एम. तुपारे यांनी व्यक्त केले. पै. जोशीलकर यांनी यावेळी विद्यालयाला पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्या संकुलात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विजेतांना पवार कुटुंबीयांच्या तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बी. एस. मुतकेकर, प्रा. एम. एम. जमादार, डॉ. राहुल पवार, एन. एस. पाटील, जी. एस. पाटील, डॉ. पी. आर. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी वसंत पवार, दिलीप पवार, संस्थेतील मुख्याध्यापक व शिक्षक, शालेय समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कांबळे व प्रा. अनिल गुरव यांनी केले तर आभार बी. ए. तुपारे यांनी मानले.
No comments:
Post a Comment