मोर्ले ते पारगड किल्ला चार वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी सरकारला अपयश, लोकप्रतिनिधी यांचे दूर्लक्ष, दोडामार्ग-चंदगड ग्रामस्थांचे २० रोजी दोडामार्ग येथे उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2024

मोर्ले ते पारगड किल्ला चार वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी सरकारला अपयश, लोकप्रतिनिधी यांचे दूर्लक्ष, दोडामार्ग-चंदगड ग्रामस्थांचे २० रोजी दोडामार्ग येथे उपोषण

 


दोडामार्ग, दि. २ फेब्रुवारी प्रतिनिधी 

       गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मार्गी लावण्यासाठी दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ मावळे यांनी संघर्ष केला अनेक आंदोलन उपोषण  केल्यावर चार वर्षापूर्वी काम सुरू झाले. पण सुरू झालेले काम गेल्या चार वर्षापासून बांधकाम विभाग वन विभाग यांच्या तसेच राज्य सरकार लोकप्रतिनिधी यांच्या बेजबाबदार पणामुळे रखडले आहे. हा रस्ता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने  दोडामार्ग चंदगड तालुक्यातील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग येथे २० फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. 

    सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर वसलेल्या शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड हा रस्ता मार्गी लावण्यासाठी गेल्या काही वर्षांत पारगड किल्ला, सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग मोर्ले गावात या ठिकाणी जवळपास ३२ आमरण तसेच बेमुदत उपोषणे केली. या नंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री असताना मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मंजूर करून कामाला सुरुवात केली.  पण गेल्या चार वर्षापासून दोडामार्ग चंदगड हद्दीतील काम बंद पडले आहे. 

     मोर्ले ते पारगड किल्ला यासाठी दोन्ही तालुक्यात वन विभाग यांची हद्द लागते यातील काही जागा दिली. हजारो झाडे तोडली वन विभाग यांनी काही वर्षे मुदत देऊन त्या कालावधीत काम  पूर्ण करावे असे निर्देश दिले होते. पण सार्वजनिक बांधकाम विभाग वेळेत काम केले नाही. 

      वन विभाग यांनी मुदत संपल्यावर काम करायला बंदी घातली. यानंतर याला मुदतवाढ घेणे ही बांधकाम विभाग यांची जबाबदारी होती. पण चार वर्षात प्रयत्न झाले नाही त्यामुळे जो रस्ता केला होता तो तीन पावसाळ्यात वाहुन गेला आहे. चर पडलेले आहेत. त्यामुळे आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी साठ किलोमीटर फेरा मारावा लागतो.  काम सुरू करण्यासाठी राज्य सरकार बांधकाम विभाग कडून काही हालचाल होतांना दिसत नाही. 

    गेल्या चार वर्षापासून बंद असलेल्या कामाविषयी पत्रव्यवहार चालू आहेत. न्यूज  वारंवार बातम्या चालू आहेत. तरी सुध्दा शासन दुर्लक्षितपणा करत आहे. शिवाय दि. १३/०६/२०२३ रोजी कोल्हापूर येथे शासन आपल्या दारी आपल्या शासनाची सभा झाली. सदर रस्त्याचे कागदपत्र पुराव्यासह मा.नामदार उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हाती दिले. पण अद्यापि काही या रस्त्याच्या कामाची हालचाल झालेली नाही. पुराव्यासंह दोन्ही तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परिस्थिती जैसे थे राहिली आहे. हा रस्ता जर लवकर पुर्ण झाला असता तर दोन्ही तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ५० खेडयांचा विकास झाला असता. कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री दिपकभाई केसरकर होते. आणि त्यांनीच हा रस्ता चालू केला होता. सदर रस्त्यासाठी सन २००५ ते २०१७ दोन्ही तालुक्याच्यां कार्यकर्त्यांनी ३२ आमरण उपोषण केली. हे नामदार दिपकभाई केसरकर आणि भाजपचे माजी आमदार  राजन तेली  यांना पुर्वकल्पना आहे. इतके असूनसुध्दा जाणिवपुर्वक या रस्त्यावर दुर्लक्षितपणा का केला? या रस्त्याच्या त्रुटींसाठी वनखात्याने शासनाकडे दिनांक ०१/०२/२०२३ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी पत्र दिले होते. त्यांच्या त्रुटी पूर्ण का नाही केल्या?  असा सवाल उपस्थित केला आहे. 

     मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मार्गी लावण्यासाठी सरकारला लोकप्रतिनिधी याना विसर पडला आहे. हे काम सुरू झाले पाहिजे यासाठी चंदगड दोडामार्ग तालुक्यातील पारगड दशक्रोशीतील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोडामार्ग येथे दि. २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार असा इशारा किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, प्रदीप सिताराम नाईक, प्रकाश गोविंद नाईक, ज्ञानेश्वर चिरमुरे, हरीश चंद्रकांत गवस, समीर रामचंद्र खुठवळकर, विजय पांडुरंग रेडकर व इतरांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment