कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
यंदा मान्सून च्या पावसाने पंधरा दिवस आधीच एन्ट्री केली आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसानेच संपूर्ण राज्याला झोडपून काढल्याने अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मुख्य पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके सुरू केली आहेत. ही प्रात्यक्षिके तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने चंदगड तालुक्यातील कोवाड नजीक ताम्रपर्णी नदीपात्रात दिनांक २७ मे २०२५ रोजी घेण्यात आली.
ताम्रपर्णीच्या काठावर असलेल्या कोवाड या मोठ्या व्यापारी पेठेत सन २०१९ मध्ये च्या अचानक आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला होता. तेव्हापासून गेली चार वर्षे सतत ताम्रपर्णी नदीला येणाऱ्या पुरात बहुतांशी बाजारपेठ बुडून लाखोंचे नुकसान होत असल्याने कोवाड हे नाव पावसाळ्याच्या दिवसांत कुप्रसिद्ध ठरत आहे. दरवर्षी येत असलेल्या महापुरामुळे सर्व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिदक्षतेची टांगती तलवार लटकलेली असते. कोवाड येथील ताम्रपर्णी नदीपात्रात गेली अनेक वर्ष साठलेला गाळ तसाच ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवत आहे. साठलेला गाळ काढणे या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अन्य जुजबी मलमपट्ट्या करण्यात प्रशासन मश्गुल दिसत आहे. या मुख्य विषयाकडे पाटबंधारे विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही अवस्था दरवर्षी निर्माण होत आहे. अशी चर्चा दोन वर्षे सुरू असून याबाबत चंदगड तालुका न्याय निवारण समिती व खुद्द कोवाड ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडूनही आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान मंगळवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक प्रसंगी मंडळ अधिकारी शरद मगदूम, प्रशांत पाटील, श्रीपाद सामंत, किरण माने, शुभम मुंढे, अक्षय कोळी आदी तलाठी, कोतवाल मारुती पाटील, संजय सुतार, शशिकांत सुतार यांच्यासह पाथ रेस्क्यू टीमचे सदस्य श्रीपाद पाटील, रामदास पाटील, विशाल परब, प्रसाद खोराटे, अवि बोलबिले, विष्णू जोशी, संजय कुट्रे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment