नागरदळे येथे माजी विद्यार्थ्यांची २५ वर्षांनी पुन्हा भरली शाळा, २००० व २००१ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2025

नागरदळे येथे माजी विद्यार्थ्यांची २५ वर्षांनी पुन्हा भरली शाळा, २००० व २००१ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     २५ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाका वरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील श्री नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.

     नागरदळे (ता. चंदगड) येथील श्री नागनाथ हायस्कूल २००० - २००१ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच नागरदळे या ठिकाणी पार पडले. या स्नेहसंमेलनात ७१ पैकी ६२ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला श्री नागनाथ हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक अजित विष्णू पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच  मारुती नांदूरकर, वसंत जोशीलकर, प्रकाश नांदुरकर, रेणुका गुरव, ए. एस. पाटील, एस. धर्माधिकारी, एस. पी. पाटील, मनोहर भोगण, कृष्णा गिरी, गुंडू मनगूतकर, पि. के. बोरगावकर, कृष्णा कांबळे हे शिक्षक उपस्थित होते.

    यावेळी बोलताना अजित पाटील म्हणाले, ``२५ वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला. सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत, बाबत समाधान व्यक्त केले. वसंत जोशीलकर यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी  एस. पी. पाटील, मारुती नांदुडकर, पी. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यमान मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याकडून भविष्यात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

     यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे भावना व्यक्त केली. शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग, लाकडी बाग यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करत असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केली.

 यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित सर्व शिक्षकांना फेटा बांधून स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शाळेसाठी आठवण म्हणून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी कडून भेटवस्तू देण्यात आली. तसेच शाळेच्या पटांगणामध्ये आठवणीसाठी वृक्षारोपण करण्यात आले.

     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार पाटील, प्रसाद पाटील, एकनाथ पाटील, विशाल कुमकर, कृष्णा पाटील, राजू पाटील, दयानंद पाटील, तुषार मनोरकर, अमित पाटील, लक्ष्मण पाटील, मीरा पाटील, सुजाता पाटील, सुरेखा पाटील व संगीता गिरी त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मीरा पाटील यांनी केले.  आभार राजकुमार पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment