गटारी बांधा.. नंतर रस्ते करा मागणी करीत आजऱ्यातील भारतनगरवासियांनी रस्त्याचे काम बंद पाडले - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2025

गटारी बांधा.. नंतर रस्ते करा मागणी करीत आजऱ्यातील भारतनगरवासियांनी रस्त्याचे काम बंद पाडले

 


आजरा: गोपाळ गडकरी, सी एल न्यूज आजरा

      पाच ते सहा महिन्यापासून मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगर पंचायत हद्दीतील भारतनगरवासीय आपल्या मूलभूत व पायाभूत सुविधाकरिता नगरपंचायत, बांधकाम विभाग तसेच वीज मंडळ यांच्याकडे निवेदने देऊन मोर्चा, ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

    ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेत गटारी बांधून सांडपाण्याचा निचरा करण्याचे आश्वासन देत प्राधान्यक्रमाने कामांची उरक करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. आज याला दोन महिन्यांचा अवधी उलटून जात आहे. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. काल अचानक जेसीबी व खडी आणून 15ते 20फूट लांबीचा रस्ता उकरून खडी टाकण्याचा प्रयत्न झाला ही घटना लक्षात येताच भारत नगर मधील काहीजण एकत्र येत तोंडाला पाने पुसण्याच्या या प्रकाराला विरोध करीत रस्त्याचे काम बंद पाडले. त्यांची मागणी फक्त इतकीच आहे कि, पहिला आर. सी. सी. गटार बांधून सांडपाण्याचा निचरा नाल्यापर्यंत न्यावा. सांडपाण्याचा निचरा झाल्याखेरीज अंतर्गत गटारी व रस्ते बांधून उपयोग होणार नाही.तेव्हा बांधकाम विभागाने सर्व प्रथम नाल्यापर्यंत जी मंजूर गटार आहे त्या गटारीचे बांधकाम पूर्ण करावे, सांडपाण्याचा निचरा करावा आणि नंतरच रस्ते व इतर विकास कामे करावीत. या अगोदर प्रशासनाने प्रधान्यक्रमाने काम करण्याचे लेखी आश्वासनही दिलेले असल्याचे भारतनगरवासियांचे म्हणणे आहे.

    यावेळी मकसूद माणगावकर म्हणाले,  सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून हिरव्या पाण्याची तळी तयार झाली आहेत, डासांच्या अळ्या तयार होत आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याचप्रमाणे हिंवताप, डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार पसरून मुले, युवक, वृद्ध तसेच महिला आजारी पडत आहेत. त्यामुळे या सांडपाण्याचा निचरा केल्याखेरीज रस्त्याचे काम होऊ देणार नाही. 30 ते 35 लाखाचं घर बांधून घरासमोर सांडपाणी साठवायचं हे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  प्राधान्यक्रमाने कामे होण्यासाठी आंदोलने, मोर्चे झाली आहेत आणि त्याप्रमाणे लेखी आश्वासनही दिले गेले आहे त्यामुळे प्रधान्यक्रम ठरवत सर्वप्रथम नाल्यापर्यंतची गटार पूर्ण करून नंतर रस्ते करावीत अशी रास्त मागणी करीत सुरु असलेल्या दहा- विस फुटाच्या रस्त्याला भारत नगर वासियांनी विरोध केला.

        यावेळी मकसूद माणगावकर, खुद्बुद्दीन तगारे, तौफिक माणगावकर, गुलाब शिकलगार, मुफिद काकतिकर, मुदस्सर इंचनाळकर, मुबारक नसरदी, सलीम ढालाईत, संगीता सुतार, चांगुणा सुतार, नाजूकबी मुल्ला, मुमताज शेख, जरीना नसरदी, सानिया माणगावकर,रुकैय्या तगारे, झुल्पीकार माणगावकर, रहीम लतीफ, रशीद लाडजी, सलाउद्दीन शेख, म्हमदू नसरदी,तोहीद माणगावकर, मुफिद काकतिकर, मुख्तार काकतिकर, रफिक आजरेकर, पापा लतीफ,मुजम्मील इन्चनाळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment