![]() |
पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत आलेल्या कोवाड येथील को. प. बंधाऱ्यांची बुधवार दि. २५/६/२०२५ ची स्थिती. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीवर असलेल्या विविध मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. झांबरे उमगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने तसेच तुफानी पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांवरील तब्बल तेरा बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे.
![]() |
पुराचे पाणी आल्याने चंदगड - हेरे मार्ग बंद. |
ताम्रपर्णी पाणलोट क्षेत्रातील जंगमहट्टी मध्यम प्रकल्पासह एकही लघु पाटबंधारे प्रकल्प अद्याप भरलेला नसतानाही ताम्रपर्णी नदीची महापुराच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान आज दिनांक २५ रोजी सायंकाळी जंगमहट्टी धरण ७७% भरले असून धरणातून ३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. झांबरे धरणातून २३० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर हिंडगाव येथील घटप्रभा धरणातून ४६६५ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. झांबरे व जंगहमट्टी धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीपात्रात पाणी अतिरिक्त पाणी वाढणार आहे.
![]() |
पाण्याखाली गेलेला नांदवडे-करंजगाव मार्गावरील करंजगाव पुल. |
सध्या सुरू असलेला पाऊस ४-५ दिवस असाच सुरू राहिल्यास सर्वच मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची शक्यता असल्याने पूरस्थिती अधिक बिकट होणार आहे. दरम्यान काल रात्रीपासून कोवाड येथील जुन्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने खालच्या भागातील व्यापारी पेठेत पाणी घुसले आहे पुराचे पाणी घुसले आहे त्यामुळे सर्वच व्यापारी वर्गात जनतेचे वातावरण पसरले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने सावधगिरी बाळगण्याचा इशारा कोवाड व किणी ग्रामपंचायत मार्फत सर्व रहिवासी व व्यापारी वर्गाला नोटीस द्वारे बजावण्यात आला आहे.
कोवाड व कागणी बेळगाव मार्गावरील बाजारपेठेतील व्यापारी वर्गात संभाव्य पुराच्या आशंकेमुळे घबराट पसरली आहे.
सन २०१९ मधील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील विध्वंसक महापुराच्या आठवणी नदी काठावरील शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मनात घर करून बसल्या आहेत. तेव्हापासूनच दरवर्षीच्या महापुराला कारणीभूत ठरत असलेला ताम्रपर्णी नदीत गेली अनेक वर्षे साठलेला गाळाच्या मातीचा पडलेला व दरवर्षी नव्याने पडत असलेला भराव यामुळे नदी पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहे. हा गाळ व नदीपात्रातील वाळू काढण्यासाठी वारंवार मागणी व आंदोलने करूनही शासन व संबंधित विभागांकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेली पाच वर्षे पावसाळ्यातील किमान दोन महिने महापुराची टांगती तलवार कोवाड बाजारपेठेतील व्यापारी वर्गावर लटकलेली आहे. पावसाळ्यातील किमान १५-२० दिवस पुराचे पाणी पेठेत ठाण मांडून बसलेले असते. परिणामी व्यापार ठप्प असतो. पावसाळ्यातील तीन महिने व्यापार बेभरवशाचा असल्यामुळे विविध बँकांची कर्जे घेऊन विविध दुकाने व्यवसाय, व्यापार उद्योग सुरू केलेल्या कुटुंबांवर कर्जावरील वाढत्या व्याजांमुळे उपासमारीची वेळ येत आहे.
बाजारपेठेत पाणी आल्यामुळे बहुतांश वेळी आजरा, गडहिंग्लज, नेसरी ते कोवाड मार्गे बेळगाव वाहतूक ठप्प होते. दरवर्षी होणारी ही परिस्थिती पाहता यंदाच्या उन्हाळ्यात तरी नदीपत्रातील मातीचा गाळ काढला जाईल अशी सर्वांना अपेक्षा होती तथापि तीही फोल ठरली आहे. प्रत्येक वेळी आश्वासनांवर वेळ मारून नेली जाते. यंदा आश्वासन दिलेला अधिकारी पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी बदलून दुसरीकडे गेलेला असतो, त्यामुळे विचारणार कोणाला? हा प्रश्न आंदोलकांना पडतो. ताम्रपर्णी काठावरील शेकडो शेतकरी दरवर्षीच्या महापुरामुळे हतबल झालेले आहेत. शेकडो एकर भात व ऊस शेतीचे दरवर्षी नुकसान होते. याबाबतच्या नुकसान भरपाईची आश्वासने शासनाकडून मिळाली तरी नुकसान भरपाई मिळेलच याची शाश्वती नसते. किंबहुना अनेक शेतकरी यापासून वंचितच राहतात. पावसाचे प्रमाण वाढले की विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी कोवाड सारख्या संभाव्य पुरबाधित गावांना भेटी देतात, त्यांच्या या भेटींमुळे नदीकाठावरील कोणाचे संकट हलके होते. हा संशोधनाचा विषय आहे.
No comments:
Post a Comment