कोणी घर देता का घर? चिंचणेतील त्या पती-पत्नींचा घरासाठी टाहो - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

कोणी घर देता का घर? चिंचणेतील त्या पती-पत्नींचा घरासाठी टाहो

चिंचणे येथील ज्यांच्या नावावर एक इंच जमिन अथवा घरही नसलेले निराधार कोलगे पती - पत्नी
तेऊरवाडी ( संजय पाटील ) 
         कोणी घर देता का घर ... कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय .... कुणी एक घर देता का घर ?   हा संवाद नटसम्राट नाटकातील असला तरी प्रत्यक्ष एक इंच जागा व घरासाठी टाहो  फोडण्याची वेळ चिंचणे ( ता. चंदगड ) येथील  पती जयसिंग व अंध  पत्नी  श्रीदेवी  कोलगे यांचे वर आली आहे़ .
         गेल्या २४ वर्षापासून जयसिंग  गणपती कोलगे  अत्यंत हालाखिचे जीवन जगत आहेत . जयसिंग यांचे मूळ गाव कौलगे ( ता. गडहिंग्लज ) . जयसिंग याचा विवाह १९९३ साली चिंचणे येथील शांता यांचे यांचेशी झाला . सासऱ्याने दिलेल्या जागेत जयसिंगने आपल्या संसाराला सुरवात केली . लग्नानंतर काही दिवसातच पत्नी आजारी पडली .सतत विस वर्षे आजारी असणाऱ्या पत्नीची सेवा केवळ दिवस मजूरी करुन केली . शेवटच्या टप्प्यात तीन लाख उसने कर्जे घेऊन पत्नीचा इलाज केला .पण दुर्दैवाने पत्नी २०१३ मृत झाली. यानंतर सासऱ्याने दिलेला आश्रय काढून घेतला . त्यामुळे २५ वर्षांच्या वास्तव्यानंतरही जयसिंग बेघर झाला . यानंतर निराधार जयसिंगने निमशिरगाव ( ता. शिरोळ ) येथील अंध असलेल्या श्रीदेवी सुकूमार गवंडी ( कांबळे ) हिचेशी २०१५ साली विवाह केला .
          जयसिंग व श्रीदेवी चिंचणे गावचे कायमचे रहिवासी आहेत . त्यांचेकडे आधार कार्ड , निवडणूक कार्ड , रेशनकार्ड आहे . पण नावावर एक रुपया व एक इंच जगा व घर नाही . सध्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ते रहात आहेत . सध्या चालू असलेल्या पावसामुळे या शेडमधील सर्व जागा जलमय झाली आहे .तसेच त्या शेतकऱ्याला हा शेड लागणार असल्याने तो खाली करण्यासाठी जयसिंगला सांगितले आहे . त्यामूळे ना घरका ना घाटका अशी अवस्था या निराधार पतीपत्नींची झाली आहे . अंध पत्नीसोबत मोलमजूरी व बकरी पाळून जगणाऱ्या या उभयतांनी  चिंचणे ग्रामपंचायत , तहसिलदार , जिल्हाधिकारी यांचेकडे घरकूल व घराच्या जागेसाठी वारंवार मागणी केली आहे . प्रशासनाने केवळ चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीला दिले आहेत . हजारो एकर गावठाण असणाऱ्या चिंचणेला या निराधारांसाठी एक गुंठा जरी जागा मिळाली तरी त्याना खूप मोठा आधार मिळू शकतो . प्रशासनाने याचा विचार करून तसे आदेश चिंचणे ग्रामपंचायतीला देण्याची अत्यंत गरज आहे.

No comments:

Post a Comment