यावर्षी तालुक्यातील काजुला चांगला दर मिळणार का? काजूदराबाबत शेतकरी संघटनानी योग्य भूमिका घेण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2021

यावर्षी तालुक्यातील काजुला चांगला दर मिळणार का? काजूदराबाबत शेतकरी संघटनानी योग्य भूमिका घेण्याची गरज

काजूसह काजूची बोंडे

नंदकुमार ढेरे / चंदगड सी. एल. वृत्तसेवा

     धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करत काजू पीक सजले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात या वर्षीकाजू पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीत झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. यावर्षी दरही चांगला मिळण्याची अपेक्षा असली तरी उत्पादन सुरू झाल्यानंतर दर एकदम कोसळतो हा अनुभव नवा नाही. त्यामुळे योग्य दरासाठी काजू उत्पादक काय भूमिका घेतात आणि तालुक्यातील शेतकरी संघटनांचे दरासाठी योगदान कसे राहते यावरच यंदाचा काजू हंगाम शेतकर्याना लाभदायक ठरणार का हे अवलंबून असेल.

        चंदगड तालुक्यात काजू फळधारणेस प्रारंभ झाला असून उत्पादक शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे काजू कवडीमोलाच्या भावाने काजूचे विक्री झाल्याने शेतकर्याना मोठा फटका बसला होता. यावर्षी काजू पीक उत्तम स्थितीत मोहरले असून उत्पादनही चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. इतर पिकाप्रमाणे मोठी गुंतवणूक होत नसल्याने काजू पिक चंदगडकरांसाठी किफायतशीर आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून मे पर्यंत काजू बागेत निगराणी करावी लागते . यासाठी मनुष्यबळ खर्ची पडत असल्याने यासाठी घेतले जाणारे कष्ट हे अधिकच आहेत. हंगामात काजू बाग दोन ते तीन वेळा बेंदावी लागते. बागेत खोप तयार करून दिवसभर काजूची राखण करावी लागते. काजू वेचणीसाठी घरातील सर्वच मंडळी कामाला लागतात. त्यामुळे यापिकासाठी घेतला जाणारा वेळ आणि मनुष्यबळ पाहता योग्य भाव मिळणे अपेक्षित असते. तीन - चार वर्षांपूर्वी काजूला प्रतिकिलो १६० रुपये भाव मिळाला होता. चंदगडची काजू रुचकर असूनही तिला हमीभाव नसल्याने काजू उत्पादकांचा अपेक्षाभंग होत आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका काजू उत्पादकांनाही बसला. उत्पादकाकडून व्यापाऱ्याने केवळ ६० ते ८० रुपये प्रति किलो या दराने काजू खरेदी केली. काही शेतकऱ्यांनी दोन - तीन महिने काजू साठा घरीच ठेवला . आज ना उद्या दर वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र भाव न वाढल्याने अखेर मिळेल त्या दराला काजू विक्री करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू उत्पादनावर फिरते. लग्नसराईच्या हंगामातच काजूची सुगी होत असल्याने शेतकरी कुटुंबातील अनेक गरजांची पूर्तता या काजूवर ठरवली जाते. काजू राखण, पक्व झालेले पीक जमा करणे, बागेची स्वच्छता, नवीन रोपांची जोपासना, काजू झाडावर फवारणी करणे अशी कामे करत चार पाच महिने वेळ देणाऱ्या शेतकऱ्यांना काजू पिकाला योग्य भाव मिळाला की कष्टाचे चीज होते. 



No comments:

Post a Comment