ताम्रपर्णी नदीत भरलेला गाळ न काढल्याने कोवाड व नदीकाठच्या गावांवर महापुराची टांगती तलवार - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2025

ताम्रपर्णी नदीत भरलेला गाळ न काढल्याने कोवाड व नदीकाठच्या गावांवर महापुराची टांगती तलवार

कोवाड येथील ताम्रपर्णी नदीत नवीन पूल व बंधाराच्या मध्ये पुराच्या पाण्या सोबत येऊन पडलेल्या मातीच्या भरावामुळे ४०% नदीपत्र ब्लॉक झाले आहे.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
       ताम्रपर्णी नदी काठावर वसलेल्या  कोवाड बाजारपेठेतील व्यापारी व नदी काठावरील शेतकरी दरवर्षी नदीला येणाऱ्या  महापुरा पुढे हतबल झाले आहेत. या महापुराला कारणीभूत असलेला नदीतील गाळ काढण्याची मागणी पाच वर्षांपासून सुरू आहे. यंदाचा उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी गाळ तसाच राहिल्यामुळे महापुराचे संकट पावसाळ्यात पुन्हा घोंगावणार अशीच चिन्हे दिसत आहेत. यामुळे कोवाड येथील व्यापारी तसेच ताम्रपर्णी नदीकाठच्या शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
नदीतील गाळ काढण्याच्या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी जुन्या बंधाऱ्यावर बोंब मारो आंदोलन करताना कोवाड येथील ग्रामस्थ व व्यापारी. (संग्रहित छायाचित्र)

        सन २०१९ मध्ये ५ ऑगस्ट च्या मध्यरात्री अचानक आलेल्या प्रलयंकारी महापुरात कोवाड  बाजारपेठेतील चारशे पेक्षा अधिक व्यापाऱ्यांची दुकाने व त्यातील मालमत्तेचे कोट्यावधींचे नुकसान झाले. कोवाड, निट्टूर, दुंडगे, कालकुंद्री, राजगोळी बुद्रुक आदी गावांतील शेकडो घरे पुराचे पाणी गावात घुसल्यामुळे कोसळली. तर ताम्रपर्णी काठावरील विशेषतः माणगाव पासून खाली शिवणगे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, निट्टूर, कोवाड, कालकुंद्री, किणी, कुदनुर आदी गावातील हजारो एकर जमीन १५ दिवस पाण्याखाली बुडाल्याने सर्व पिके कुजून गेली. त्यानंतर दरवर्षीच कमी अधिक प्रमाणात महापुराची टांगती तलवार व्यापारी व शेतकरी वर्गावर लटकलेली आहे. दर पावसाळ्यात दोन- तीन वेळा येणाऱ्या महापुराला नदीत साठलेली वाळू व मातीच्या गाळाचा भराव कारणीभूत ठरत आहे. हे ओळखून २०१९ च्या महापुरानंतर चंदगड तालुका अन्याय निवारण संघर्ष समिती, व्यापारी संघटना व विविध राजकीय पक्ष यांनी वेळोवेळी हा गाळ काढण्यात यावा यासाठी आंदोलने केली या आंदोलनाला ग्रामपंचायत कोवाड यांनीही पाठिंबा व्यक्त केला होता. नदीतील गाळ काढायचा नाही हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर प्रत्येक आंदोलनावेळी पाटबंधारे विभागाची अधिकारी देत वेळ मारून नेत आले आहेत. तथापि यंदा धोरण बदलू नाही गाळ काढण्याच्या कोणत्याच हालचाली उन्हाळ्यात दिसून आल्या नाहीत.  सांगितले. प्रत्येक आंदोलना वेळी वेळ मारून नेण्यापुरती आश्वासने देण्याचेच काम प्रशासन अधिकारी यांच्याकडून झाले आहे. 
       दरवर्षी पुराच्या वेळी भेट देण्यास येणारे अधिकारी लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी महापुरावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन जातात त्याचे पुढे काय होते हा संशोधनाचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षभरात ग्रामस्थ, व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर, प्रांताधिकारी गडहिंग्लज, तहसीलदार चंदगड व आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदने दिली आहेत. पण प्रत्येक वेळी गाळ काढण्यासाठी निधी लावला आहे अशा प्रकारची मोघम उत्तरे ऐकून घेण्यापलीकडे आम्हाला काही मिळाले नाही असे व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
  दरम्यान विविध नद्यातील साठलेल्या गाळामुळे संपूर्ण राज्यभर पावसाळ्यात महापुरांना आमंत्रण मिळत आहे हे ओळखून शासनाने नदीतील गळा बद्दलचे धोरण बदलून गाळ काढण्यास परवानगी  दिल्याच्या बातम्या प्रसिद्धी झाल्या. यामुळे २०२५ च्या उन्हाळ्यात तरी ताम्रपर्णीतील गाळ काढला जाईल ही अपेक्षा होती. तथापि  तीही फोल ठरली आहे. गेल्या सहा महिन्यात गाळ काढण्याची मागणी करणारे आंदोलकही  काहीसे थंडावल्याचे जाणवले. 
      कोवाड येथील नवीन पूल बांधकामापूर्वी नदीत गाळ पडण्याचे प्रमाण कमी होते तथापि नवीन पूल झाल्यापासून पूल व बंधारा या दोन्ही दरम्यान मोठ्या प्रमाणात गाळ मातीचा भराव साठला आहे. या गाळाने सुमारे ४० टक्के नदी पात्र व्यापले आहे. परिणामी पाण्याचा वेगाने निचरा होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. सद्यस्थितीत जुन्या बंधाऱ्याच्या  खालील नदीपत्रात मोठ्या प्रमाणात भराव व वाळू  साठली आहे. त्याचबरोबर किणी हद्दीतील बेळगाव बस स्टॅन्ड ते किणी फाटा रस्त्याची पूर्वीपेक्षा तीन ते चार फूट उंची वाढवून काँक्रिटीकरण केले आहे. पूर्वी या बाजूनेही पुराचे बरेच पाणी जात होते. ते या रस्त्यामुळे आता अडवले जाणार असल्याने महापुराचा धोका वाढण्याची शक्यता बळावली आहे. 
       संभाव्य महापुराची शक्यता लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसात प्रशासकीय अधिकारी यांनी कोवाड येथे भेट दिली. नदीपात्रात आपत्कालीन प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. यावेळी महापुराला कारणीभूत असलेले गाळ करण्याऐवजी नको त्या उपायोजना सुरू असल्याबाबत व्यापाऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment